मुरुम : हॉटेल चालवण्याच्या जुन्या वादातून आणि विरोधातून एका ३६ वर्षीय तरुणावर तलवार, हंटर आणि बंदुकीच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील आलूर येथे घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न व शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मीकांत यादव गुरवे (वय ३६, रा. आलूर, ता. उमरगा) यांचे आलूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘लोकेश चायनीज’ नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलच्या पाठीमागेच आरोपींची घरे आहेत. लक्ष्मीकांत यांनी हे हॉटेल चालवावे, याला आरोपींचा तीव्र विरोध होता. याच कारणामुळे त्यांच्यात यापूर्वीही भांडणे झाली होती.
नेमके काय घडले?
गुरुवारी (दि. २६ मार्च) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास याच जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी लक्ष्मीकांत यांना गाठले. त्यांना शिवीगाळ करत आरोपींनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याजवळील लोखंडी पट्टी, तलवार, हंटर आणि चक्क बंदुकीने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला चढवला. या भयंकर मारहाणीत लक्ष्मीकांत गुरवे हे गंभीर जखमी झाले आहेत.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल:
या घटनेनंतर रुग्णालयात उपचार घेत असताना, फिर्यादी लक्ष्मीकांत गुरवे यांनी शुक्रवारी (दि. २७ मार्च) दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून मुरुम पोलीस ठाण्यात खालील ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
-
सोन्या मंडले (रा. बेरडवाडी)
-
अभि मंडले (रा. कोथळी)
-
डीडी चव्हाण (रा. आलूर)
-
राजु मडीवाळ (रा. आलूर, ता. उमरगा)
-
इतर एक अज्ञात इसम
या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ४९, ३(५) सह भारतीय हत्यार कायदा (शस्त्र अधिनियम) कलम ३ आणि २५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मुरुम पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





