कळंब : हॉटेलच्या किचनमध्ये घुसून परस्पर काजू आणि शेंगदाणे खाणाऱ्या व्यक्तीला ‘ऑर्डर देऊन टेबलवर मागा’ असे सांगितल्याच्या रागातून बार्शी येथील एका टोळक्याने कळंब शहरातील प्रेरणा बार अँड हॉटेलमध्ये मोठा राडा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी हॉटेल कामगारांना दगडाने मारहाण करत तोडफोड केली आणि गल्ल्यातील १५ हजार रुपयांची रोकड लुटली. त्यानंतर याच टोळक्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याची साडेतीन तोळ्याची सोन्याची साखळी हिसकावून नेली. या दोन्ही घटना शनिवारी (ता. १४) भरदुपारी घडल्या असून, याप्रकरणी रविवारी (ता. १५) कळंब पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
किचनमध्ये घुसून वाद आणि हॉटेलमध्ये तोडफोड
पहिल्या घटनेत ओमकार ऊर्फ गणेश सुभाष पाटील (वय ३६, मूळ रा. बार्शी, सध्या रा. प्रेरणा हॉटेल, कळंब) यांनी फिर्याद दिली आहे. ओमकार हे कळंब-परळी रोडवरील हॉटेल प्रेरणा बारमध्ये आचारी (वस्ताद) म्हणून काम करतात. शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या (१४.३५ वा.) सुमारास एक व्यक्ती हॉटेलच्या किचनमध्ये आला आणि परस्पर काजू, खोबरे व शेंगदाणे खाऊ लागला. त्यावेळी ओमकार यांनी त्याला, “तुम्हाला काय हवे असेल ते ऑर्डरमध्ये द्या, मी टेबलवर आणून देतो,” असे सांगितले.
याचाच राग आल्याने आरोपी सागर साळुंके, अनिल साळुंके आणि त्यांच्या सोबतच्या इतर आठ जणांनी (सर्व रा. बार्शी, जि. सोलापूर) बेकायदेशीर जमाव जमवून ओमकार यांच्यासह हॉटेलमधील दुसरे कामगार परमेश्वर तांबारे यांना शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच हॉटेलमधील काचेचे ग्लास आणि ग्रिल फोडून ८ हजार रुपयांचे नुकसान केले. मॅनेजरची गच्ची धरून काउंटरमधील १५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली व दारूचे बिल न देताच तेथून पळ काढला. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या तरुणाला लुटले
हॉटेलमध्ये राडा केल्यानंतर याच टोळक्याने काही वेळातच दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुसरी घटना घडवली. प्रेरणा हॉटेलसमोरून जावळे नगरकडे जाणाऱ्या रोडवर शशांक श्रीकांत मोदी (वय ३४, रा. सावरगाव, ता. कळंब) हे जात होते. यावेळी आरोपी सागर साळुंके, अनंत ऊर्फ दादासाहेब पवार आणि इतर चार अनोळखी व्यक्तींनी (सर्व रा. बार्शी) विनाकारण शशांक यांना अडवून शिवीगाळ केली आणि काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.
या प्रकाराची पोलिसांत तक्रार देण्यासाठी शशांक जात असताना, आरोपींनी रस्त्यात त्यांची स्कूटी अडवली. गच्चीस धरून त्यांच्या गळ्यातील तब्बल साडेतीन तोळ्यांची सोन्याची साखळी जबरदस्तीने तोडून घेतली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शशांक मोदी यांच्या तक्रारीवरून कळंब पोलिसांत चोरी आणि मारहाणीचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाच टोळक्याने भरदुपारी कळंब शहरात राडा करत दहशत माजवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास कळंब पोलिस करत आहेत.






