बेंबळी : जास्त व्याजाचे आमिष दाखवून आणि परताव्याची हमी देऊन ठेवीदाराची ५ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बेंबळी (ता. जि. धाराशिव) येथे समोर आला आहे. याप्रकरणी ‘श्री चतु:श्रृंगी महिला सरकारी पतसंस्थे’च्या चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि इतर संचालकांसह एकूण १२ जणांवर बेंबळी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रेमराज शिंदे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांची पत्नी लक्ष्मीबाई शिंदे यांनी बेंबळी येथील श्री चतु:श्रृंगी महिला सरकारी पतसंस्थेत खाते उघडून पैसे गुंतवले होते. पतसंस्थेच्या संचालकांनी त्यांना जास्त व्याजदराची हमी दिली होती. मात्र, संस्थेने सप्टेंबर २०२० पासून व्याज देणे बंद केले. त्यानंतर मुदत संपूनही शिंदे यांच्या पत्नीच्या नावावर असलेली ५ लाख ८५ हजार रुपयांची मुद्दल रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १ सप्टेंबर २०२० ते ७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत घडला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रेमराज शिंदे यांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात खालील १२ जणांवर भारतीय दंड विधान (IPC) कलम ४२० (फसवणूक), ४०९ (विश्वासघात), ४०६, ४१५, १४७ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे:
१. मनिषा प्रमोद पवार (चेअरमन) २. अर्चना श्रीहरी शिवलकर (व्हा. चेअरमन) ३. जयश्री धनंजय मुंगळे (सचिव) ४. प्रतिभा बालाजी गावडे (संचालक) ५. श्रीदेवी युवराज दाणे ६. जयदबी इरफान शाह ७. सुवर्णा रवी कांबळे ८. अनिता अनिल कांबळे ९. सुषमा महादेव माळी (लोखंडे) १०. मिना गौतम जावळे ११. सुरेखा बालाजी ढोरमारे १२. धनंजय जनार्धन मुंगळे (सर्व रा. बेंबळी, ता. जि. धाराशिव)
या प्रकरणाचा अधिक तपास बेंबळी पोलीस करत आहेत.







