धाराशिव: बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेंढा तांडा येथे लग्नसमारंभात जेवण वाढण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला आणि भांडण सोडविण्यासाठी आलेल्या साक्षीदारांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेंढा तांडा (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी बलभिम रामा राठोड (वय ४८) यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मेंढा तांडा येथे ही घटना घडली. विकास माणिक राठोड, अर्जुन शाहुराज पवार, विष्णू शाहुराज पवार (सर्व रा. उजनी तांडा, ता. औसा, जि. लातूर) तसेच सुभाष सखाराम जाधव, समाधान बब्रुवान राठोड, उषा बळी जाधव, वर्षा सुभाष जाधव, मिरा बब्रुवान राठोड, पारु माणिक राठोड (सर्व रा. मेंढा तांडा, ता. जि. धाराशिव) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून, लग्नात जेवण वाढण्याच्या कारणावरून फिर्यादी बलभिम राठोड यांना शिवीगाळ केली.
यानंतर आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून जखमी केले. हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या साक्षीदारांनाही आरोपींनी मारहाण करून जखमी केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
बलभिम राठोड यांनी २६ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलिसांनी वरील नऊ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२)(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.