भूम: “तुझ्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी आम्हाला १० लाख रुपये दे,” अशी मागणी करत एका २४ वर्षीय तरुणाला दुचाकीची जोराची धडक देऊन, फरफटत नेत झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना भूम तालुक्यातील सोनगिरी येथे घडली आहे. ‘कोर्टाच्या तारखेला कसा हजर राहतो तेच बघतो’ अशी जीवे मारण्याची धमकीही या तरुणाला देण्यात आली आहे. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील पाच जणांसह एकूण सहा जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल नवनाथ मारकड (वय २४ वर्षे, रा. सोनगिरी, ता. भूम, जि. धाराशिव) असे या मारहाणीत जखमी झालेल्या आणि फिर्याद दिलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवार, दि. २६ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अतुल हा सोनगिरी शिवारातील कुटे वस्तीकडे जाणाऱ्या पुलाजवळून जात होता.
यावेळी आरोपी विठ्ठल कसबे, पांडुरंग कसबे, लक्ष्मी कसबे, गजराबाई कसबे, रामहरी कसबे आणि आणखी एक अनोळखी व्यक्ती (सर्व रा. सोनगिरी, ता. भूम) यांनी त्याला गाठले. “तुझ्या विरोधात दिलेली तक्रार आम्ही मागे घेतो, त्याबदल्यात तू आम्हाला १० लाख रुपये दे” अशी मागणी आरोपींनी केली. यावरून आरोपींनी त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलने अतुलच्या गाडीला जोराची धडक दिली. त्यानंतर त्याला काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जखमी केले.
एवढ्यावरच न थांबता आरोपींनी अतुलला फरफटत नेऊन एका झाडाला बांधून ठेवले आणि ‘तू कोर्टातील तारखेला कसा हजर राहतोस, तेच बघतो’, असे म्हणत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या जीवघेण्या हल्ल्यातून कशीबशी सुटका झाल्यानंतर अतुल मारकड यांनी गुरुवारी (दि. २६) भूम पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या खळबळजनक फिर्यादीवरून पोलिसांनी विठ्ठल कसबे, पांडुरंग कसबे, लक्ष्मी कसबे, गजराबाई कसबे, रामहरी कसबे आणि इतर एकावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(४), १२७, ११८(१), ११५(२), ३५१(३), १८९(२), १९० आणि १९१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे भूम तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.






