धाराशिव: मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवल्याने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी ऊस उत्पादक शेतकरी आयुब शेख (रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि साखर आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची देणी दिली जात नाहीत, तोपर्यंत म्हेत्रे यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश देऊ नये, अशी मागणीही शेख यांनी केली आहे.
शेतकरी आर्थिक संकटात, आत्महत्येच्या मार्गावर
अक्कलकोट तालुक्यातील माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मालकीच्या मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याने तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे ऊस बिल दिले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून अनेक शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर असल्याचे गंभीर वास्तव मांडण्यात आले आहे. साखर प्रशासनानेही शेतकऱ्यांना ऊस बिलाचे पैसे न दिल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. “कारखानदार जोमात, शेतकरी कोमात” अशी सध्याची परिस्थिती असून शेतकऱ्यांना कोणताही सण उत्सव साजरा करता येत नाहीये किंवा शेतीची मशागतही करता येत नसल्याचे गाऱ्हाणे मांडले आहे.
कारखान्याकडून धमक्या, बिलासाठी चकरा
शेतकरी वारंवार कारखान्याच्या चकरा मारून बिलाची मागणी करत आहेत. मात्र, “तुम्हाला काय करायचे आहे ते करा, आम्ही बिल देत नाही,” अशा धमक्या शेतकऱ्यांना दिल्या जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री आणि साखर आयुक्तांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन
अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली आहे. शेतकऱ्यांचे ऊस बिल देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करून ते मिळवून द्यावे आणि त्यानंतरच सिद्धाराम म्हेत्रे यांचा पक्षप्रवेश स्वीकारावा, अशी विनंती आयुब शेख यांनी केली आहे. तसेच, साखर आयुक्तांनी मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याने बिल न दिल्याने सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
आठ दिवसांचा अल्टिमेटम
शेतकरी पुत्र आयुब शेख यांनी येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांचे ऊस बिल न मिळाल्यास साखर आयुक्तांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा दिला आहे. या तक्रारीची उपमुख्यमंत्री आणि साखर आयुक्तांनी लवकरात लवकर नोंद घेऊन थकलेले ऊस बिल शेतकऱ्यांना मिळवून द्यावे, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.