धाराशिव : सोयाबीन विकल्यानंतर व्यवहारादरम्यान चुकून भलत्याच व्यक्तीच्या खात्यात जमा झालेले १ लाख ५४ हजार रुपये परत मिळवून देण्यात धाराशिवच्या सायबर पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि योग्य कायदेशीर पाठपुराव्यामुळे तब्बल तीन महिन्यांनंतर ही रक्कम तक्रारदार महिलेला परत मिळाली आहे.
किणी (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी पूनम दीपक दंडनाईक यांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी धाराशिव येथील अडत बाजारात आपले सोयाबीन विकले होते. यावेळी पैशांचा ऑनलाइन व्यवहार करताना त्यांच्याकडून चुकून भलत्याच ‘स्कॅनर’वर (क्यूआर कोड) १ लाख ५४ हजार रुपये पाठवले गेले. ही चूक लक्षात आल्यावर पूनम यांनी त्या अज्ञात नंबरवर संपर्क करून पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र, समोरच्या व्यक्तीने पैसे परत करण्यास स्पष्ट नकार दिला.
पैसे बुडाल्याची भीती निर्माण झाल्याने पूनम यांनी तात्काळ ‘एनसीसीआर’ पोर्टलच्या ‘१९३०’ या हेल्पलाइनवर संपर्क साधून आपली तक्रार दाखल केली. या तक्रारीची धाराशिव सायबर पोलिसांनी गंभीर दखल घेतली. पोलिसांनी तातडीने संबंधित बँकेशी पत्रव्यवहार करून अज्ञात व्यक्तीच्या खात्याची माहिती मिळवली. तक्रार वेळेत प्राप्त झाल्याने पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत त्या अज्ञात खात्यावरील रक्कम तत्काळ ‘फ्रीझ’ (गोठवली) केली.
रक्कम फ्रीझ झाल्यानंतर ती पुन्हा तक्रारदाराच्या खात्यात वळती करण्यासाठी बँकेने न्यायालयाच्या आदेशाची (कोर्ट ऑर्डर) मागणी केली. यावर सायबर पोलिसांनी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाचा आदेश बँकेला सादर केला. या सर्व प्रक्रियेनंतर अखेर मंगळवारी (ता. १७ मार्च २०२६) पूनम दंडनाईक यांना त्यांचे हक्काचे १ लाख ५४ हजार रुपये परत मिळाले. आपली कष्टाची रक्कम परत मिळाल्याने त्यांनी सायबर पोलिसांचे विशेष आभार मानले.
ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शकील शेख, पोलिस शिपाई गाडे (बक्कल नं. ८०) व पोलिस शिपाई सूर्यवंशी (बक्कल नं. ६४०) यांच्या पथकाने केली.
पोलिसांचे आवाहन : फसवणूक झाल्यास ‘१९३०’ वर संपर्क साधा
“नागरिकांची कोणतीही ऑनलाइन आर्थिक फसवणूक किंवा सायबर क्राईम (हॅकिंग इ.) झाल्यास त्यांनी घाबरून न जाता तात्काळ भारत सरकारच्या ‘नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल’वर (NCCR) किंवा १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवावी. किंवा धाराशिव सायबर पोलिस ठाण्यात येऊन त्वरित संपर्क साधावा,” असे आवाहन धाराशिव पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.







