धाराशिव: एकीकडे विकासाच्या गप्पा, दुसरीकडे मात्र अंतर्गत कुरघोडी! धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा गाडा पुढे सरकण्याऐवजी महायुतीच्याच नेत्यांमधील मतभेदांच्या चिखलात रुतल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पत्रात नेमकं काय?
आकांक्षित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या धाराशिवसाठी आरोग्य, शिक्षण, जलसंधारण अशा अनेक महत्त्वपूर्ण योजनांचा निधी मंत्रालयातच अडकून पडला आहे. याबाबत अनेक बैठका होऊनही निधी वितरणाचा मार्ग मोकळा होत नसल्याने पालकमंत्री सरनाईक कमालीचे संतापले आहेत. १० जून रोजी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे मांडली. “इतर जिल्ह्यांना निधी मिळत असताना केवळ धाराशिवला वगळणे हे दुर्दैवी आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.
आमदारांवर थेट निशाणा!
या पत्रात सरनाईक यांनी थेट आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवला आहे. “निधी वितरणासाठी आमदार महोदयांनी माझ्याशी किंवा मंत्रालयाशी कोणताही संपर्क किंवा पाठपुरावा केलेला नाही,” असा स्पष्ट उल्लेख करत सरनाईक यांनी महायुतीतील समन्वयाच्या अभावावरच बोट ठेवले आहे.
राजकीय कलगीतुऱ्यात विकासाचा बळी
नेत्यांच्या या बेबनावाचा थेट फटका मात्र जिल्ह्याच्या विकासाला बसत आहे. आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, रोजगार हमी यांसारख्या योजना निधीअभावी रखडल्या आहेत. यामुळे, ‘नेते राजकारणात व्यस्त, आणि जनता विकासापासून वंचित’ अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
आता या ‘लेटर बॉम्ब’नंतर सरकार कोणती भूमिका घेणार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील या आरोपांवर काय स्पष्टीकरण देणार, याकडे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत मात्र, जिल्ह्याच्या विकासाचा ‘टॉप गियर’ पडण्याऐवजी गाडी ‘न्यूट्रल’मध्येच अडकून पडली आहे, हे निश्चित!