धाराशिव: दारू पिऊन बसलेल्या तरुणांनी एका कुटुंबाला पाहून मोठ्याने शेरेबाजी केली. ‘तुम्ही असे का बोलता?’ असा जाब विचारल्याच्या रागातून १२ जणांच्या जमावाने कुटुंबाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना गडदेवदरी (ता. धाराशिव) येथे घडली. तसेच, ‘धाराशिवला आल्यावर कापून टाकू’ अशी जिवे मारण्याची धमकीही या मद्यपींनी दिली आहे. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांची नावे आणि अन्य नऊ जण अशा एकूण १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडदेवदरी (ता. जि. धाराशिव) येथील बाबू मरेगा आढाव (वय ३८) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. ३० एप्रिल) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गडदेवदरी जवळील रेल्वे ब्रिजजवळ आणि गावातील चौकात हा प्रकार घडला.
फिर्यादी बाबू आढाव यांचा भाऊ दत्ता, विकास, त्यांची पत्नी आणि मुलगा हे येथून जात होते. त्यावेळी आरोपी सोमनाथ बंडू धोत्रे, लक्ष्मण दिलीप घोडके, काशिनाथ चन्नप्पा दंडगुले (सर्व रा. वडार गल्ली, धाराशिव) व त्यांचे इतर ९ साथीदार तेथे दारू पीत बसले होते. कुटुंबाला पाहून या मद्यपींनी काहीतरी मोठ्याने बोलण्यास सुरुवात केली.
यावेळी फिर्यादीच्या भावाने ‘तुम्ही असे का बोलता?’ असे विचारत त्यांना जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून कुटुंबाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने कुटुंबाला बेदम मारहाण करून जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, ‘तुम्ही धाराशिवला आल्यावर तुम्हाला कापून टाकतो,’ अशी गंभीर धमकीही या तरुणांनी दिली.
या मारहाणीत जखमी झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून बाबू आढाव यांनी शुक्रवारी (दि. १ मे) पोलिसांत तक्रार दिली. या प्रथम खबरीवरून (FIR) धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात वरील सर्व १२ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), १२५(अ), १२५(ब), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२) आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.






