धाराशिव – धाराशिव नगर पालिकेत झालेल्या बेकायशीर आणि चुकीच्या गुंठेवारी प्रकरणी चार कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी वसुधा फड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सात दिवसाच्या आत खुलासा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देखील त्यांना देण्यात आली आहे.
तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्या कार्यकाळात जवळपास १३४ जणांचे बेकायशीर आणि चुकीच्या पद्धतीने गुंठेवारी करून लेआऊट मंजूर करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकरणात भूखंडाचे सर्व्हे मधील स्थान दर्शवणारा मोजणी नकाशा नसल्याने व काही प्रस्तावामध्ये कच्चा रेखांकन नकाशा नसल्याने मंजूर विकास योजनेमध्ये प्रस्तावाअंतर्गत भूखंडाचे निश्चित होत नाही. तसेच काही संचिकांमध्ये मूळ मालक यांच्याकडील क्षेत्रामध्ये १० टक्के जागेचे क्षेत्र हस्तांतरित न करता गुंठेवारी अंतर्गत भूखंड नियमितीकरणाची कार्यवाही करण्यात आली आहे.
तसेच रद्द केलेल्या रेखांकन प्रस्तावास मंजुरी देणे, बांधकामाचे विकास शुल्क न आकारणे, मूळ मालकाचे नावे गुंठेवारी करणे, खरेदीदार व्यक्तिरिक्त इतरांचे नावे गुंठेवारी करणे, भोगवटदार वर्ग २ चे जमिनीचे विभाजन करून गुंठेवारी करणे, बेकायदेशीर बांधकाम नियमित करणे, बांधकामाचे अधिमूल्य न आकारणे, विकास शुल्कात ५० टक्के सवलत देणे आदी गैरव्यवहार करण्यात आले आहेत. तसेच गुंठेवारी नियमाधिन केलेल्या परवानगीची प्रत जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास पाठवण्यात आली नाही. काही प्रस्तावात ५० टक्के सूट देण्यात आली असली तरी उर्वरित रक्कम देखील नगर पालिकेत जमा झाली नाही.
या गैरव्यवहार प्रकरणी चार कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी वसुधा फड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, नगर अभियंता भारत विधाते, लिपिक गोरोबा आवचार , स्थापत्य अभियंता दत्तात्रय कवडे यांचा समावेश आहे. सात दिवसाच्या आत खुलासा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही देण्यात आली आहे. भादंवि १८६० चे कलम १६६, ४०९ प्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा का दाखल करू नये ? अशी विचारणा देखील करण्यात आली आहे.
धाराशिव पालिकेतील कथित बोगस गुंठेवारीचे प्रकरण धाराशिव लाइव्हने सर्वप्रथम उघडकीस आणले होते. याप्रकरणी आ. सुरेश धस यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला असता, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पालिका मुख्याधिकारी वसुधा फड यांना विचारणा केली असता, आता दोषी कर्मचाऱ्यांना नोटीस बजवण्यात आली आहे. मात्र कारवाई करण्यास मुख्याधिकारी वसुधा फड असमर्थ ठरत आहेत. पालिकेकडे पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ मागितले आहे. हा टोलवाटोलवीचा प्रकार असल्याची चर्चा पालिका परिसरात सुरु आहे.