धाराशिव : शहरातील बायपास रोडवर ५ ऑगस्ट रोजी एका ५२ वर्षीय दुचाकीस्वाराला चिरडणाऱ्या अवैध टिप्पर (MH 25 U 1107) प्रकरणात प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचा एक भयानक नमुना समोर आला आहे. अपघात घडल्या दिवशीच पोलिसांनी हा टिप्पर जप्त करून शहर पोलीस ठाण्याच्या आवारात लावला होता. मात्र, अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, गाडी पोलिसांच्या ताब्यात असतानाच दुसऱ्या दिवशी (६ ऑगस्ट रोजी) या गाडीचा आरटीओ टॅक्स भरण्यात आला आहे! गाडी समोर नसताना आणि गाडीचा इन्शुरन्स (विमा) नसताना आरटीओने ही पावती फाडलीच कशी? असा संतापजनक सवाल आता उपस्थित होत आहे.
या संपूर्ण प्रकरणावरून टिप्पर मालकाने आरटीओ अधिकाऱ्यांचे खिसे गरम करून हे प्रकरण ‘मॅनेज’ केल्याचे उघड झाले आहे.
काय आहेत हे अनुत्तरित आणि गंभीर प्रश्न?
१. पोलीस ठाण्यात गाडी, मग टॅक्स भरला कसा?
पाच ऑगस्ट रोजी अपघात झाल्यानंतर शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अपघातग्रस्त टिप्पर पोलीस स्टेशनच्या आवारात जप्त करून ठेवला. वाहन पोलिसांच्या ताब्यात असताना त्याच्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये कोणताही फेरफार करता येत नाही. तरीही ६ ऑगस्ट रोजी या गाडीचा आरटीओ (RTO) टॅक्स भरला गेला. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात असलेल्या गाडीचा टॅक्स रातोरात भरण्याची हिंमत मालकाने केलीच कशी आणि त्याला आरटीओने साथ कशी दिली?
२. गाडी समोर नसताना पावती दिली कुणी?
कोणत्याही व्यावसायिक वाहनाचा थकीत टॅक्स किंवा इतर प्रक्रिया पूर्ण करताना वाहन निरीक्षकांकडून (RTO Inspector) त्याची प्राथमिक पडताळणी होणे अपेक्षित असते. गाडी पोलीस स्टेशनमध्ये उभी असताना आरटीओ अधिकाऱ्यांनी कोणती गाडी पाहून ही टॅक्सची पावती दिली? की कार्यालयात बसूनच अंधारात कारभार हाकला गेला?
३. इन्शुरन्स नसताना टॅक्स कसा स्वीकारला?
सर्वात मोठा तांत्रिक आणि कायदेशीर प्रश्न म्हणजे, या टिप्परचा पीयुसी (PUC) संपलेला होता आणि गाडीचा वैध विमा (Insurance) देखील नव्हता. नियमानुसार, इन्शुरन्स नसताना वाहनाचा टॅक्स भरून घेतला जाऊ शकत नाही. असे असताना आरटीओने नियम धाब्यावर बसवून टॅक्सची रक्कम कशी स्वीकारली? सिस्टीममध्ये ही एंट्री कशी झाली?
‘अर्थपूर्ण’ तडजोड आणि धाराशिव आरटीओमधील भ्रष्टाचाराची कीड
टिप्पर मालकाने स्वतःला वाचवण्यासाठी आणि कागदपत्रांमधील गंभीर त्रुटी लपवण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांना मोठी रक्कम देऊन हे संपूर्ण प्रकरण ‘मॅनेज’ केल्याचा थेट आरोप आता होत आहे. धाराशिव आरटीओ कार्यालयाच्या भ्रष्ट कारभाराबद्दल यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल आहेत. मात्र, एका निष्पाप माणसाचा बळी गेल्यानंतरही गुन्हेगाराला वाचवण्यासाठी कागदपत्रांची अशी बेकायदेशीर जुळवाजुळव करण्यास आरटीओ अधिकारी मदत करत असतील, तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कुणाकडे?
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीची गरज:
अपघातानंतरची ही ‘बनवाबनवी’ आता पुराव्यांसहित समोर आली आहे. या प्रकरणात केवळ टिप्पर मालकच नव्हे, तर बेकायदेशीररित्या टॅक्सची पावती फाडून देणारे आरटीओ अधिकारीही तितकेच दोषी आहेत. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी आणि पोलीस अधीक्षकांनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी संतप्त मागणी धाराशिवकरांमधून होत आहे.




