धाराशिव भाजपमधील ‘राणा प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचा नवा बिझनेस मॉडेल आता पक्षातल्याच जुन्या आणि निष्ठावंत नगरसेवकांच्या जिवावर उठला आहे. बाहेरून येणाऱ्यांसाठी ‘रेड कार्पेट’ आणि घरातल्या निष्ठावंतांना ‘उपाशी’ ठेवण्याचा साहेबांचा (आमदार राणा पाटील) आणि भावी खासदारांचा (मल्हार पाटील) डाव आता त्यांच्यावरच बूमरँग होऊ लागला आहे. त्यातच १ कोटींच्या घोडेबाजाराची चर्चा आणि तुळजापूरच्या नगराध्यक्षांनी टाकलेला व्हॉट्सॲप बॉम्ब, यामुळे साहेबांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे!
‘ऑपरेशन लोटस’ पार्ट-२: १ कोटींचा ‘रेट’ लिक अन् वाटेतूनच यू-टर्न!
चार दिवसांपूर्वी कळंबमधील ठाकरे गटाचे ९ नगरसेवक फोडल्यानंतर साहेबांचा कॉन्फिडन्स एकदम सातव्या आस्मानावर गेला होता. लगेचच ‘ऑपरेशन लोटस’चा पार्ट-२ प्लॅन करण्यात आला. धाराशिव नगरपालिकेतील ठाकरे गटाच्या ७ पैकी ४ नगरसेवकांना गळाला लावण्यात आले. हे चारही जण भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी गाडीत बसून थेट मुंबईला निघाले होते!
पण थांबा, पिक्चरमध्ये इथंच मोठा ट्विस्ट आला! हे नगरसेवक वाटेत असतानाच, मीडियात आणि राजकीय वर्तुळात या ‘घोडेबाजाराचा रेट’ अचानक लिक झाला. “एका नगरसेवकाला १ कोटी रुपये!” अशी चर्चा वाऱ्यासारखी पसरली. बदनामीच्या भीतीने आणि डील उघडकीस आल्याने, या नगरसेवकांच्या गाडीने वाटेतूनच ‘यू-टर्न’ घेतला आणि प्रवेश चक्क लांबणीवर पडला! आता मार्केटमध्ये अशी हवा आहे की, हे चार नगरसेवक ‘भाव’ न पटल्यामुळे किंवा बदनामीमुळे दुसऱ्याच पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत.
घरच्यांना उपाशी, बाहेरच्यांना तुपाशी!
तिकडे मुंबईच्या वाटेवर १ कोटींच्या रेटची चर्चा सुरू असताना, इकडे धाराशिव आणि तुळजापूरमधील मूळ भाजप नगरसेवकांच्या डोळ्यांतून मात्र पाणी येत होते! नगरसेवकांची खदखद अशी आहे की, “दुसऱ्या पक्षातले नगरसेवक फोडण्यासाठी साहेबांकडे खोकेच्या खोके आणि लाखो रुपये मोजायला आहेत, पण गेल्या सहा महिन्यांत आमच्या हातात विकासाचा एक ‘छदाम’ (दमडी) सुद्धा पडलेला नाही!”
सगळी मलाई आणि रेड कार्पेट फक्त बाहेरून येणाऱ्या ‘आयारामांसाठी’ आणि जे पक्षाशी एकनिष्ठ राहून निवडून आले, त्यांच्या वाट्याला फक्त सतरंज्या आणि कोरडी आश्वासने? या भेदभावामुळे नगरसेवकांचा संताप आता अनावर झाला आहे.
१४० कोटींचा मलिदा फक्त साहेबांच्या ‘लाडक्या’ कंत्राटदारांना!
या नाराजीचे दुसरे आणि सर्वात मोठे कारण म्हणजे ‘टेंडर’चे राजकारण! धाराशिव आणि तुळजापूर या दोन्ही नगरपालिकेत सध्या भाजपचीच सत्ता आहे. पण सत्तेचा मलिदा मात्र फक्त साहेबाच्या खिशात जात आहे.
-
धाराशिवचा फॉर्म्युला: शहरात तब्बल १४० कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. पण हे काम कुणाला मिळाले? तर राणा पाटलांच्या एकाच ‘लाडक्या’ कंत्राटदाराला!
-
तुळजापूरचा फॉर्म्युला: तुळजापूर शहरातील मोठी कामे कुणाला दिली? तर तीही थेट छत्रपती संभाजीनगरमधील एका कंत्राटदाराला, जो योगायोगाने साहेबांचा दुसरा ‘लाडका’ आहे!
सर्व मलाईदार टेंडर्स फक्त साहेबांच्या लाडक्यांच्या घशात जात असल्याने, स्थानिक भाजप नगरसेवकांनी करायचं काय? केवळ बघ्याची भूमिका घ्यायची का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
नगराध्यक्ष पिटू गंगणे यांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!

हा सगळा अन्याय सहन करण्यापलीकडे गेल्यावर, आता तुळजापूरमधून बंडाचा पहिला अधिकृत ‘बॉम्ब’ फुटला आहे. तुळजापूरचे भाजप नगराध्यक्ष पिटू ऊर्फ विनोद गंगणे यांनी आपल्या व्हॉट्सॲपवर एक अतिशय सूचक आणि खळबळजनक स्टेटस ठेवले— “आमचं ठरलंय!”
राजकारणात ‘आमचं ठरलंय’ या एका वाक्याचा अर्थ किती भयंकर असू शकतो, हे साहेबांना नव्याने सांगण्याची गरज नाही. गंगणे यांच्या या एका स्टेटसने राणा गटाच्या पायाखालची वाळू सरकवली आहे. तुळजापूरचे भाजप नगरसेवक आता थेट राणा पाटलांवर दबाव आणत असून, “आमची कामे द्या, नाहीतर आमचा मार्ग मोकळा आहे,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
थोडक्यात सांगायचे तर, विकत घेतलेल्या नव्या शिलेदारांच्या आनंदात साहेब मग्न असताना, त्यांच्या स्वतःच्याच घरात (तुळजापूर आणि धाराशिवमध्ये) बंडाचा ज्वालामुखी फुटण्याच्या बेतात आहे. आता नगराध्यक्षांचे ‘काय ठरलंय?’ हे पाहणे संपूर्ण जिल्ह्यासाठी सर्वात मोठा राजकीय सस्पेन्स ठरणार आहे!





