धाराशिव – लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्यानंतर ५ जून रोजी आचारसंहिता संपणार आहे. आचारसंहिता संपताच धाराशिव जिल्हा पोलीस दलातील पोलिसांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या होणार आहेत. त्यामुळे क्रिम पोस्टिंग मिळावी म्हणून अनेक पोलिसांनी खटपट सुरु केली आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची लवकरच बदली होणार आहे. जाता – जाता पोलिसांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याचा आदेशावर ते सही करणार आहेत. त्यामुळे कोणत्या पोलिसांच्या कुठे बदल्या होणार ? याकडे आता लक्ष वेधले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा ( एलसीबी ) हे सोन्याचे अंडे देणारा विभाग समजला जातो. या विभागात पोस्टिंग मिळावी, यासाठी अनेक पोलिसांनी फिल्डिंग लावली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी कोणाला कौल देणार, हे लवकरच कळणार आहे. या विभागात पाच वर्षांपासून अधिक काळ काम करणारे पोलीस सध्या चिंताग्रस्त दिसत आहेत. आता किमान चांगले पोलीस स्टेशन मिळावे,अशी त्यांची अपेक्षा आहे.
स्थानिक गुन्हे शाखेनंतर उमरगा, नळदुर्ग, तामलवाडी, येरमाळा , धाराशिव ग्रामीण, आनंदनगर पोलीस स्टेशमध्ये पोस्टिंग मिळावी, यासाठी अनेक पोलिसांचा ओढा आहे.
जे पोलीस एकाच उपविभागात १० – १२ वर्षांपासून कार्यरत आहेत, त्यांच्या पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी बदल्या करणार का ? आणि स्थानिक गुन्हे शाखेत प्रामाणिक पोलिसांची नेमणूक करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.