धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुराळा खाली बसतो न बसतो तोच सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी ‘महायुती’च्या गोटातच ‘महायुद्ध’ पेटले आहे. एकीकडे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ‘बदल हवा’ म्हणत ३१ सदस्य कोकण दौऱ्यावर नेले असताना, इकडे धाराशिवमध्ये माजी आरोग्यमंत्री आ. तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी थेट भाजपलाच ‘कात्रजचा घाट’ दाखवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून भाजप आणि शिंदे गटात मानापमान नाट्य रंगात आले आहे.
संख्याबळाचा खेळ आणि कोकणची सहल
नुकत्याच लागलेल्या निकालात भाजप १८, शिवसेना शिंदे गट १५, राष्ट्रवादी ६, शिवसेना ठाकरे गट ८, काँग्रेस ३, समाजवादी १ आणि अपक्ष ४ असे पक्षीय बलाबल स्पष्ट झाले आहे. स्पष्ट बहुमतासाठी २८ या जादुई आकड्याची गरज आहे. ही जुळवाजुळव करण्यासाठी आ. राणा पाटील यांनी भाजपचे १८, शिवसेनेचे (शिंदे गट) २ आणि राष्ट्रवादीचे ६ , काही अपक्ष अशा ३१ सदस्यांची मोट बांधत त्यांना सुरक्षित स्थळी कोकण दौऱ्यावर रवाना केले आहे. मात्र, या सहलीनेच ठिणगी पडली आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडल्या
सत्तेच्या या रस्सीखेचीत दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे ॲड. अजित खोत यांनी आ. राणा पाटलांवर शिवसेनेचे दोन सदस्य पळवल्याचा खळबळजनक आरोप केला. याला प्रत्युत्तर देताना आ. राणा पाटील यांनी स्वतः न बोलता भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या खांद्यावरून बंदूक चालवली. “भूम-परंडा मतदारसंघात तानाजीरावांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, काँग्रेस आणि ‘उबाठा’ला मदत केली,” असा आरोप कुलकर्णी यांनी केला.
यावर आज शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख दत्ताआण्णा साळुंखे आणि अविनाश खोपे यांनी पत्रकार परिषद घेत थेट आव्हान दिले. “राणा पाटील, हिंमत असेल तर स्वतः पुढे येऊन बोला, दत्ता कुलकर्णींचा वापर करू नका,” असा घणाघात त्यांनी केला. एवढेच नव्हे, तर “तुम्ही ३६ सदस्य दाखवा, आम्ही २८ सदस्य दाखवून सत्ता स्थापन करून दाखवू,” असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
विरोध भाजपला नाही, ‘घराणेशाही’ला!
या सर्व राजकीय कलगीतुऱ्यात मूळ मुद्दा वेगळाच आहे. आ. तानाजी सावंत यांचा विरोध भाजपला नसून आ. राणा पाटील यांच्या घराणेशाहीला असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आपल्या पत्नी सौ. अर्चना पाटील यांना मिळावे, यासाठी राणा पाटील यांची फिल्डिंग सुरू आहे. नेमकं हेच समीकरण मोडून काढण्यासाठी सावंत गट सक्रिय झाला असून, त्यांनी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी सौ. उषाताई गायकवाड यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवण्याची चाल खेळली आहे.
शिंदे गटातच ‘गटबाजी’चे ग्रहण
शिवसेना शिंदे गटाच्या १५ सदस्यांमध्येही तीन गट पडले आहेत:
१. सावंत समर्थक: ८ सदस्य
२. गायकवाड/चौगुले समर्थक: ५ सदस्य (जे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या जवळचे मानले जातात)
३. राणा पाटील समर्थक: २ सदस्य (जे मुळात भाजपचे असून शिंदे गटाच्या तिकीटावर निवडून आले आहेत).
पालकमंत्री प्रताप सरनाईक हे ‘अडीच वर्षे भाजप, अडीच वर्षे शिंदे गट’ असा तोडगा काढण्याच्या प्रयत्नात असतानाच, स्थानिक पातळीवर मात्र दुही माजली आहे.
भाजपला वगळून ‘मॅजिक फिगर’ जुळणार?
जर राणा पाटील यांनी माघार घेतली नाही, तर शिंदे गट भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी ‘प्लॅन बी’ वापरू शकतो.
-
शिवसेना शिंदे गट: १५
-
शिवसेना ठाकरे गट: ८
-
काँग्रेस: ३
-
समाजवादी पक्ष: १
-
अपक्ष: २
हे सर्व एकत्र आल्यास संख्याबळ २९ वर पोहोचते (बहुमत २८). त्यामुळे भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधात बसण्याची वेळ येऊ शकते.
व्हीपचा ‘ट्विस्ट’
राणा पाटलांच्या गळाला लागलेले शिंदे गटाचे जे दोन सदस्य कोकणात आहेत, ते मुळात भाजपचे कार्यकर्ते आहेत. मात्र, तांत्रिकदृष्ट्या ते शिवसेनेचे सदस्य आहेत. ऐनवेळी शिंदे गटाने व्हीप बजावला, तर या दोन सदस्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी होणार आहे.
आता या सत्तेच्या सारीपाटावर राणा पाटलांची ‘कोकण नीती’ चालणार की तानाजी सावंतांचे ‘गणित’ जुळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.







