धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असली, तरी संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगलीये ती एका ‘हाय-व्होल्टेज’ राजकीय थराराची! शुक्रवारी धाराशिव झेडपीच्या आवारात जो प्रसंग घडला, तो एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नव्हता. निमित्त होतं झेडपी निवडणुकीचं, पण आमनेसामने आले होते ते पारंपारिक राजकीय वैरी… निंबाळकर आणि पाटील!
सीन १: गेटवरच भिडल्या नजरा!
झेडपी निवडणुकीची लगबग सुरू होती. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आपल्या आलिशान गाडीतून झेडपीच्या गेटवर उतरले. योगायोग असा की, अगदी त्याच वेळी उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू डॉ. जयराजे निंबाळकर यांचीही तिथे एन्ट्री झाली. दोघांची समोरासमोर भेट झाली आणि जयराजेंनी तिथेच राणा पाटलांना एक करडी खुन्नस दिली. पण हा तर फक्त ट्रेलर होता.
सीन २: खांद्याला खांदा घासला अन्… “इकडे बघ!”
खरा थरार घडला तो झेडपी सभागृहाबाहेर! मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आमदार राणा पाटील आणि मल्हार पाटील बाहेर पडत होते. समोरून जयराजे आपल्या समर्थकांसह येत होते. एकमेकांना क्रॉस करताना दोघांचाही खांदा एकमेकांना घासला गेला. वातावरणात क्षणात तणाव वाढला. दोन्ही गटांचे समर्थक आमनेसामने येणार असं वाटत असतानाच, जयराजेंनी मागे वळून राणा पाटलांना थेट आव्हान दिलं… “इकडे बघ!” वातावरण चांगलंच तापलं होतं, राडा होण्याची दाट शक्यता होती. पण तिथेच उपस्थित असलेले उबाठा आमदार कैलास पाटील यांचे बंधू आतिष पाटील यांनी प्रसंगावधान राखत जयराजेंना शांत केलं. दुसरीकडे, आमदार राणा पाटील यांनीही कुठलीही प्रतिक्रिया न देता, या ‘खुन्नस’कडे पूर्णपणे दुर्लक्ष करत संयमाने पुढे जाणं पसंत केलं. त्यांच्या या शांत भूमिकेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनीही तात्काळ हालचाल करत जयराजे आणि त्यांच्या समर्थकांना बंदोबस्तात तिथून बाहेर काढलं.
नेहमी शांत असणारे जयराजे अचानक का संतापले?


पेशाने डॉक्टर असलेले जयराजे निंबाळकर हे तसे शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. मग आज अचानक त्यांचा पारा का चढला? याचं उत्तर दडलंय एका १८ वर्षांच्या जुन्या खदखदीत!
जयराजेंचे वडील कै. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येला आता १८ वर्षे उलटून गेली आहेत, पण या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. या हत्या प्रकरणात राणा पाटलांचे वडील पद्मसिंह पाटील हे आरोपी आहेत. तोच न्याय न मिळाल्याचा आणि वडिलांच्या हत्येचा संताप आज जयराजेंच्या डोळ्यांत आणि कृतीत स्पष्ट दिसत होता.
थोडक्यात काय… झेडपीच्या सत्तेचा गुलाल कुणीही उधळला असला, तरी धाराशिवच्या राजकारणात निंबाळकर विरुद्ध पाटील या पारंपारिक घराणे-संघर्षाची आग अजूनही किती धगधगती आहे, हेच या घटनेने पुन्हा एकदा संपूर्ण राज्याला दाखवून दिले आहे.







