नमस्कार वाचकहो! ‘फेसबुक पिंट्या उर्फ पावशेरसिंह’ यांच्या पोकळ घोषणांच्या आणि ‘कॅमेरा-शो’च्या सीरिजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. साहेबांच्या राजकारणाचा एक साधा, सोपा आणि अलिखित नियम आहे: जुन्या घोषणांची मुदत संपली आणि त्या हवेत विरल्या की, लगेच एक नवीन पत्रकार परिषद घ्यायची आणि नवीन घोषणांची ‘हवाई पुडी’ हवेत सोडून द्यायची!
आजच्या पत्रकार परिषदेत साहेबांनी अशी काही भन्नाट हवा केलीये, की ती ऐकून धाराशिवच्या जनतेला हसावं की रडावं हेच कळेनासं झालंय. चला तर मग, साहेबांच्या या नव्या ‘मास्टरस्ट्रोक’ची आणि पाकीटमार पत्रकारांच्या सर्कशीची पोलखोल करूया!
साहेबांच्या ‘नव्या’ आणि ताज्या घोषणा: थेट मंगळावर जाण्याची तयारी!
-
१. तुळजापूरजवळ ‘विमानतळ’ उभारणार:
साहेब म्हणतात की आता तुळजापूरला थेट विमानतळ येणार! अरे साहेब, जिल्ह्याला साधे खड्डेमुक्त रस्ते देता आले नाहीत, तिथे तुम्ही थेट विमानं उतरवणार? की विमानाच्या चाकांसाठी रस्त्यावरचे खड्डेच ‘रनवे’ म्हणून वापरणार आहात?
-
२. जुलै २०२७ पर्यंत तुळजापूर रेल्वेने जोडणार:
कालपर्यंत ज्या रेल्वेचं श्रेय घेण्यासाठी तुम्ही दुसऱ्या नेत्यांच्या (सूर्यराजेंच्या) मंजूर फाईल्सवर स्वतःच्या नावाचा शिक्का मारत होतात, आता तुम्ही थेट मुदत देत आहात? काम केंद्र सरकार करणार आणि तुम्ही फक्त तारखा वाटत फिरणार!
-
३. दरडोई उत्पन्न २ लाखांच्या पुढे:
साहेब म्हणतात, आजघडीला जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न दोन लाखांच्या पुढे गेलंय आणि देशाची खूप वेगाने प्रगती झालीये! हे ऐकून सामान्य माणसाने खिशात हात घातला, तर त्याला फाटका खिसाच लागला. मग हे २ लाख रुपये नक्की कोणाच्या खात्यात जमा झालेत? तुमच्या मागेपुढे फिरणाऱ्या चमच्यांच्या की त्या पाकीटमार पत्रकारांच्या?
-
४. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पुराचं पाणी आणणार:
ज्या नेत्याला शेतकऱ्याच्या हक्काचा पीक विमा वेळेवर मिळवून देता येत नाही, ते साहेब आता थेट कोल्हापूर-सांगलीच्या पुराचं पाणी धाराशिवमध्ये आणणार आहेत! साहेब, आधी गावातल्या नळाला पाणी आणा, पुराचं पाणी आणायला अजून जन्म घ्यावा लागेल.
जुन्या घोषणांची कचराकुंडी: याचं काय झालं साहेब?
नवीन घोषणांचा पाऊस पाडताना साहेबांना त्यांच्या जुन्या घोषणांचा सोयीस्कर विसर पडला आहे. पण जनता काही विसरलेली नाही:
-
तुळजापूरला जागतिक दर्जाचे प्राणी संग्रहालय: काय झालं त्या जागतिक प्राणी संग्रहालयाचं? प्राणी आलेच नाहीत, फक्त इलेक्शनच्या वेळी रंग बदलणारे ‘राजकीय सरडे’ तेवढे जिल्ह्याला पाहायला मिळाले!
-
येडशीची जंगल सफारी आणि ‘मिनी माथेरान’: येडशीला माथेरान बनवणार होता ना? तिथे जंगल सफारी तर सोडाच, आता तिथे फक्त साहेबांच्या ‘खोट्या आश्वासनांचीच’ सफारी चालू आहे.
-
कौडगाव एमआयडीसीतील टेक्सटाईल आणि लेदर पार्क: १० हजार तरुणांना रोजगार देणार होतात! तिथे एक साधा रुमाल किंवा चपलेचा जोड तरी तयार झाला का? की तिथेही आता बायोडिझेलच्या नावाखाली फक्त जमिनीच लाटल्या जात आहेत?
‘पाकीटमार’ पत्रकारांची फौज आणि साहेबांचा दरबार
आजच्या पत्रकार परिषदेतला सर्वांत मोठा विनोद म्हणजे समोर बसलेले ‘पाकीटमार आणि दांडकेबहाद्दर’ पत्रकार! साहेब जेव्हा विमानतळ आणि पुराचं पाणी आणण्याच्या गप्पा मारत होते, तेव्हा हे पत्रकार फक्त माना डोलावत होते.
एकाही पत्रकाराची हिंमत झाली नाही साहेबांना हे विचारायची की, “साहेब, विमानतळ नंतर आणा, पण आधी त्या जुन्या प्राणी संग्रहालयाचं आणि टेक्सटाईल पार्कचं काय झालं ते सांगा!” पण ते विचारणार कसे? खिशात ‘पाकीट’ असल्यावर तोंडातून शब्द थोडेच फुटणार आहेत! साहेबांनी हवेत गोळी मारायची आणि या पाकीटमार पत्रकारांनी ती झेलून आपल्या पोर्टलवर ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून चालवायची, हाच यांचा रोजचा धंदा झालाय.
तात्पर्य:
धाराशिवकरांनो, काल साहेब तुम्हाला रेल्वेच्या ट्रॅकवर फिरवत होते, आता थेट ‘विमानात’ बसवून हवेत उडवणार आहेत. त्यांच्या या खोट्या घोषणांच्या ‘हवाई प्रवासाला’ बळी पडू नका. जमिनीवर राहा, वास्तव ओळखा, आणि पुढच्या निवडणुकीत या पोकळ घोषणांना त्यांची योग्य जागा नक्की दाखवा!






