उमरगा : ऊस बिलाचे अर्धे पैसे का घेतले, या कारणावरून झालेल्या वादात एका ५८ वर्षीय व्यक्तीला त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांनी शिवीगाळ करत, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून उजवा हात पिरगळून फॅक्चर केल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हानमंत बळीराम कटारे (वय ५८, रा. सुंदरवाडी) यांना आरोपी शशिकला हानमंत कटारे, बळीराम हानमंत कटारे आणि राहुल हानमंत कटारे (सर्व रा. सुंदरवाडी) यांनी दिनांक २ जून २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मारहाण केली. “उसाच्या बिलाचे अर्धे पैसे का घेतले?” अशी विचारणा करत आरोपींनी फिर्यादी हानमंत कटारे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांचा उजवा हात पिरगळून फॅक्चर केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर हानमंत कटारे यांनी दिनांक १४ जून २०२५ रोजी मुरुम पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शशिकला, बळीराम आणि राहुल कटारे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुरुम पोलीस करत आहेत. कौटुंबिक वादातून झालेल्या या गंभीर मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू आहे.