मुंबई – महाराष्ट्र शासनाने नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांबाबत माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या नव्या उपक्रमाद्वारे शासनविषयक बातम्यांची दखल घेऊन नागरिकांना अधिक चांगल्या सेवा पुरविण्याचा उद्देश आहे, अशी माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिली.
माध्यमांमधील बातम्यांची त्वरित दखल
या परिपत्रकाद्वारे माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या विविध बातम्यांची शासकीय विभागांकडून तात्काळ दखल घेण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी आणि समस्यांचे जलद निराकरण होणार आहे. कार्यक्षम सेवा वितरण यंत्रणा आणि समस्यांचे त्वरित निवारण करण्यासाठी माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या माहितीचा उपयोग केला जाणार आहे.
परिपत्रकाचे उद्दिष्टे:
- माध्यमांशी संवाद वाढविणे: शासकीय विभाग आणि माध्यमांमधील समन्वय वाढवून माहितीची देवाण-घेवाण सुलभ करणे.
- नागरिक-शासन दुवा मजबूत करणे: माध्यमांच्या माध्यमातून शासनाचे कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचविणे.
- पारदर्शक संवाद प्रक्रिया: शासनाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणणे.
- नियमित माहितीची देवाण-घेवाण: माध्यमांशी सातत्याने संपर्क ठेवणे.
कार्यपद्धती:
- प्रत्येक विभागात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती: संबंधित विभागात नोडल अधिकारी नेमले जातील.
- बातम्यांची त्वरित दखल: माध्यमांमधील महत्त्वपूर्ण बातम्यांची तात्काळ दखल घेतली जाईल.
- साप्ताहिक कृती अहवाल: माध्यमांमधील बातम्यांच्या अनुषंगाने कृती अहवाल तयार करणे.
- मासिक पुनर्विलोकन बैठका: शासनाच्या उपाययोजना आणि परिणामांचा आढावा घेण्यासाठी मासिक बैठका आयोजित केल्या जातील.
अपेक्षित परिणाम:
- माध्यमांमधील बातम्यांमुळे नागरिकांच्या समस्यांचे जलद निराकरण.
- नागरिकांच्या समाधानात वृद्धी आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढ.
- सुशासन आणि शासनाच्या प्रतिमेला बळकटी.
शासनाच्या कार्यक्षमतेला बळकटी
“हे परिपत्रक पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या माहितीची दखल घेऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित होईल,” असे श्री. ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.