धाराशिव – जालना जिल्ह्यातील आन्वा (ता. भोकरदन) गावात एका तरुणावर अमानुष अत्याचार झाल्याच्या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी बहुजन योद्धा सामाजिक संघटनेने केली आहे. संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. 6) मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे की, आन्वा येथील धनगर समाजातील तरुण कैलास बोराडे याला मंदिरात आल्याच्या कारणावरून लोखंडी सळईने चटके देत अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप असून, यापूर्वीही परभणी व बीड जिल्ह्यात अशा घटनांमुळे कायद्याचा धाक राहिलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, अशा अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, या घटनेत एका राजकीय नेत्याच्या भावाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पुरोगामी महाराष्ट्र आणि संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यात अशा घटना घडणे निंदनीय आहे. कायद्याचा वचक नसल्यामुळे राज्यात वारंवार अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे, त्यामुळे संबंधित दोषींना कठोर शासन करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या निवेदनावर धनंजय शिंगाडे यांच्यासह मिलिंद चांडगे, हरिदास शिंदे, दिनेश बंडगर, इलियास मुजावर, अॅड. बुद्धभूषण माने, संजय थोरात, अनिरुद्ध कावळे, विनोद कदम, प्रशांत कांबळे, सम्राट वाघमारे, बंटी मुंडे, रणजित बनसोडे, अनंत दहिहंडे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.