कळंब: हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या ग्राहकांनी ‘जेवणाची ऑर्डर घ्यायला किती वेळ लागेल?’ अशी साधी विचारणा केली असता, त्यांना थेट चाकू, बिअरची बाटली आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना कळंब शहरातील केज रोडवरील हॉटेल प्रेरणा येथे घडली आहे. याप्रकरणी बार्शी येथील एका कुटुंबातील पाच जणांना गंभीर दुखापत झाली असून, कळंब पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर सुभाष साळुंखे (वय ३१ वर्षे, रा. रामेश्वर मंदिराजवळ, भवानी पेठ, कुर्डूवाडी रोड, बार्शी, जि. सोलापूर) हे आपले चुलते मनोज साळुंखे, बलभीम साळुंखे, गणेश साळुंखे आणि विजय साळुंखे यांच्यासह १४ मार्च २०२६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कळंब येथील केज रोडवर असलेल्या ‘प्रेरणा हॉटेल’मध्ये जेवणासाठी गेले होते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी ‘जेवणाची ऑर्डर द्यायला किती वेळ लागेल?’ अशी विचारणा केली.
मात्र, एवढ्याशा कारणाचा राग आल्याने आरोपी अभिषेक मुंडे, सागर मुंडे, ओंकार मुंडे, भैय्या सगरे, सुमित मोदी आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीने साळुंखे कुटुंबीयांशी थेट हुज्जत घातली.
वाद वाढल्यानंतर या सहाही जणांनी मिळून सागर साळुंखे आणि त्यांच्या चुलत्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी ग्राहकांवर चाकू, बिअरची बाटली आणि लाकडी दांडक्याने सपासप वार करत त्यांना गंभीर जखमी केले.
या भयंकर प्रकारानंतर, फिर्यादी सागर साळुंखे यांनी गुरुवारी (दि. २६ मार्च) कळंब पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अभिषेक मुंडे, सागर मुंडे, ओंकार मुंडे, भैय्या सगरे, सुमित मोदी आणि एका अनोळखी व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११९(२), ११५(२), ३५२, ३२४(४), १८९(१), १८९(२), १८९(४), १९०, १९१(१), १९१(२) आणि १९१(३) अन्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या क्षुल्लक कारणावरून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.






