शिराढोण: कळंब तालुक्यातील वडगाव (शि.) येथे शेतातून जाण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी झालेल्या मारामारीत झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले असून, याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांविरोधात शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयश्री सुरेश बंडगर (वय ३०, रा. वडगाव शि.) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. जयश्री बंडगर यांच्यासह गोपाळ बंडगर, युवराज बंडगर, शामल बंडगर आणि दुर्गाबाई बंडगर हे शेताच्या रस्त्यावरून जात असताना आरोपींनी त्यांना अडवले.
शेतातून का जाता, असे म्हणत आरोपींनी फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी लाकडी काठ्यांनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सर्वांना जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर जयश्री बंडगर यांनी २६ ऑगस्ट रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी धर्मराज तायप्पा बंडगर, सत्यभामा दुर्गाअप्पा चव्हाण, महादेव तुकाराम बंडगर, तुकाराम गुराप्पा बंडगर आणि यल्लप्पा शेटीबा बंडगर (सर्व रा. वडगाव शि.) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(१),(२),(३३), १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. शिराढोण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.