कळंब – कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी शिवारात शेतजमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये गंभीर मारहाण झाल्याची घटना ३ जून २०२५ रोजी घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात ४ जून २०२५ रोजी फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंदवले आहेत.
पहिला प्रकार:
कन्हेरवाडी येथील भाग्यश्री जयदीप जगताप (वय २५ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३ जून २०२५ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास कन्हेरवाडी शिवारातील शेत गट क्रमांक १६१ मध्ये शेतीच्या वादातून चंद्रसेन बलभिम जगताप, शिला रामभाऊ जगताप, बिभीषण जगताप, रामभाऊ जगताप, श्रीकांत प्रताप जगताप, सुजाता चंद्रसेन जगताप, चिऊ बिभीषण जगताप, सुदर्शन कोळी (सर्व रा. कन्हेरवाडी, ता. कळंब) आणि भारत ग्यानबा वाघमारे (रा. बाभळगाव, ता. कळंब) यांनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, त्यांना जिवे ठार मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी कळंब पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२), १२५(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुसरा प्रकार
शिलाताई रामभाऊ जगताप (वय ५० वर्षे, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब) यांनी दिलेल्या प्रतिफिर्यादीनुसार, ३ जून २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास त्याच शेत गट क्रमांक १६१ मध्ये भाग्यश्री जयदीप जगताप, रामेश्वर रावण जगताप, अशोक रामेश्वर जगताप आणि जयदीप रामेश्वर जगताप (सर्व रा. कन्हेरवाडी, ता. कळंब) यांनी शेतीच्या वादातून त्यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून कळंब पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे कन्हेरवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.