विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या विजयाचा दावा करत आहे, पण त्यांच्या मनात एकच मोठं स्वप्न आहे. – मंत्रीपद! मंत्रीपदाचं सोनेरी स्वप्न त्यांच्यासाठी जणू किल्ल्याच्या गुप्त दरवाजाचं तिकीट आहे, ज्यातून त्यांची सत्तेच्या माळेत एंट्री व्हावी अशी त्यांची इच्छा आहे..
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिव जिल्हा दौरा शुक्रवारी पार पडला. सभांना जोश देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी ते स्वत: प्रचार सभांना हजेरी लावत आहेत. पहिली सभा परंडा येथे होती. राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांचा प्रचार चालू होता. सकाळी ११ वाजता सभा ठरलेली, पण साहेब मात्र २ वाजता प्रकटले! आता नेता उशीरा आल्यानंतर त्यांची वाट पाहणाऱ्या लोकांना तर रागच यायला हवा, पण इथे जनता उलट ‘नेता आला’ म्हणून थोडी आश्वस्त झाली. असं वाटलं की, “चलो, साहेब आले तरी!”
सभा भर उन्हात सुरु होती. बसण्यासाठी खुर्च्या होत्या, पण मंडप नव्हता. बिचारी जनता उन्हात तळपत होती. विशेषतः महिला तर अगदी वैतागलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर घामाचे ओघळ होते, आणि सावंत यांच्या कानावर लोकांची कुजबुज पोहोचली होती, “एवढं मोठं कॅम्पेन, पण मंडप मात्र नाही. उन्हात आम्हाला बसवायला म्हणजे काय थोडं का सोपं आहे?”
मुख्यमंत्री मंचावर पोहोचताच त्यांच्या राजकीय शैलीचा पारा चढला. ते म्हणाले, “अरे, एवढं भर उन्हात माझ्या तानाजी सावंतांसाठी तुम्ही इतकी गर्दी केलीत! तानाजी सावंत यांचा विजय पक्का आहे. तुम्ही सावंतांना आमदार करा, मी त्यांना ‘नामदार’ करतो!”
त्यानंतर मुख्यमंत्री महिलांकडे पाहून म्हणाले, “लाडक्या बहिणींनो, तुम्ही इतक्या कडक उन्हात बसून राहिलात, त्यामुळे मला खूपच अपराधी वाटतं. मी तुमच्याबद्दल विचार करतो, आणि दरमहा दीड हजार रुपयांचं मानधन देतो!” आता मुख्यमंत्री यांचे शब्द ऐकून लोकांना कळेचना की ते विनोद करत आहेत की खरं बोलत आहेत. एकामागोमाग घोषणा सुरूच राहिल्या, “आता वाचवलेला मंडपाचा खर्च लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकू. दरमहा २१०० रुपये द्यायचं वचन देतो!” महिलांनी एकमेकांकडे पाहिलं, जणू विचार करत होत्या, “आता हे खरं की निवडणुकीची जादू!”
त्यानंतर धाराशिवची सभा साडेतीन वाजता सुरू झाली. इथे अजित पिंगळे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री हजर होते. पिंगळे महायुतीकडून पहिल्यांदा निवडणूक लढवत असल्याने त्यांना काही खास आश्वासनं दिली नाहीत. पिंगळे यांनी मागच्यावेळी बंडखोरी करून निवडणूक लढवली होती. पण त्यांची शिट्टी काही वाजली नव्हती. पण इथे उपस्थित असलेले भाजपचे राणा जगजितसिंह पाटील मात्र मंत्रीपदाच्या स्पर्धेत आहेत. शिंदे साहेबांची नजर त्यांच्याकडे गेली आणि त्यांना थोडं ‘प्रो’ देत म्हणाले, “अरे पिंगळे, अजून मंत्रीपदाचं काही बोलायचं नाही, पहिल्यांदाच तर निवडणूक लढवतोयस!”
शेवटी साहेब उमरग्याला पोहोचले, तेव्हा संध्याकाळचे ५ वाजून गेले होते. आता सूर्याचा पारा खाली आला होता, पण इथेही मंडप नव्हता. उमेदवार ज्ञानराज चौगुले चौथ्यांदा निवडणूक लढवत होते. शिंदे साहेब त्यांच्याकडे पाहून जणू समाधानाने म्हणाले, “चौगुलेसाहेब, तुम्हाला आता खूप अनुभव मिळाला. चौथ्यांदा निवडणूक लढवताय, म्हणजे तुम्हाला आता एक संधी द्यायला पाहिजे!” यावर चौगुलेसाहेबांचे डोळे चमकले, जणू या वेळेस मंत्रीपदाचं स्वप्न साकार होणार!
धाराशिव जिल्ह्यात चारपैकी तीन उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे आहेत. . सावंत आणि चौगुले या दोघांनी मुख्यमंत्री साहेबांकडून वचन घेतलं आहे. आता जिल्ह्यातल्या या दोघांची स्वप्नं फुलणार का? तानाजी सावंत यांना मंत्रीपदाचा पुन्हा शपथ घेण्याची संधी मिळेल का? आणि चौगुले यांची शेवटच्या प्रयत्नांत कशी भर पडेल?
विकासाचं स्वप्न, मंत्रीपदाचं स्वप्न, आणि राजकीय गणितं ह्या सर्वांची उधळण करत एकनाथ शिंदे यांनी लोकांना उत्साहात ठेवलं. पण खरी धमाल अजून बाकी होती – निवडणुकीचा निकाल काय लागणार? तेव्हा कळेल की लाडक्या बहिणीच्या खात्यात दरमहा किती रुपये येणार, आणि किती मंत्री बनणार!
– बोरूबहाद्दर