तुळजापूर: तालुक्यातील मंगरूळ येथे एका ३६ वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून आणि तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कृष्णाथ साठे (वय ३६, रा. मंगरूळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अनैतिक संबंधाच्या संशयावरून पोलिसांनी मृताच्या पत्नीसह सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, या भयंकर घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे.
मंगरूळ येथील कृष्णाथ आनंद साठे (वय ३६) यांच्या निर्घृण खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावण्यात तुळजापूर पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी प्रतिभा कृष्णाथ साठे (वय २८) आणि तिचा प्रियकर शुभम घाटुळे (वय २०) या दोघांना ताब्यात घेतले आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने हा पूर्वनियोजित कट रचून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
बुधवार, १५ एप्रिल रोजी सकाळी तुळजापूर-अक्कलकोट मार्गावरील नटकल पुलाजवळ कृष्णाथ साठे यांचा मृतदेह आढळून आला होता. अत्यंत क्रूरपणे त्यांचा जीव घेण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्याला मोठा धक्का बसला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. हा साधा गुन्हा नसून पूर्वनियोजित कट असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय होता. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांत पोलिसांनी मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या मुसक्या आवळल्या.
असा रचला कट


अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. कृष्णाथ यांच्या डोक्यात दगडाने जोरदार वार करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह फरफटत नेऊन नटकल पुलाजवळ टाकल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. या थंड डोक्याने केलेल्या नियोजनामुळे प्रकरणातील क्रौर्य समोर आले आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, याचाही कसून तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांची धडक कारवाई


जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागदेव मुद्दे, पोलीस उपनिरीक्षक विजय घोटे, पोलीस हवालदार महादेव राऊत व जी. बी. वागुलकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि स्थानिक गोपनीय माहितीचा आधार घेत आहेत. सबळ पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे गुन्हेगार कितीही चलाख असला तरी तो कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, हा कडक संदेश देण्यात आला आहे. या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.






