धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून नवरदेवाला लुटणाऱ्या ‘लुटारू नवरी’च्या टोळीचा आणखी एक धक्कादायक कारनामा धाराशिवमध्ये उघडकीस आला आहे. एका शासकीय अधिकाऱ्याशी लग्न लावून, महिनाभरातच घरातील १७ तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण २७ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन नवरीसह तिचे साथीदार पसार झाले आहेत. एवढेच नव्हे तर, बदनामी करण्याची धमकी देत या टोळीने नवरदेवाकडे तब्बल ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी शिवराज संग्राम पाटील (वय २८, रा. सुंडगी, ता. देगलूर, जि. नांदेड. हली मुक्काम- भाग्यनगर, धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिस ठाण्यात नवरीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिनाभरातच डाव साधला
फिर्यादी शिवराज पाटील हे धाराशिव येथील भाग्यनगर भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय निवासस्थानात राहतात. आरोपींनी संगनमत करून शिवराज यांच्याशी शुंभागी उर्फ साक्षी मच्छिंद्रनाथ वारले हिचे लग्न लावून दिले. १३ मे २०२६ ते ११ जून २०२६ या अवघ्या महिनाभराच्या कालावधीत नवरी आणि तिच्या नातेवाईकांनी घरातून १७ तोळे सोन्याचे दागिने (किंमत २५ लाख ८४ हजार रुपये) आणि १ लाख ७० हजार रुपयांची रोकड असा एकूण २७ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
खंडणीसाठी धमकावले
हा दरोडा टाकल्यानंतरही आरोपींचे मन भरले नाही. फिर्यादी हे शासकीय पदावर कार्यरत असल्याने त्यांची व त्यांच्या पदाची प्रतिमा समाजात मलीन करण्याची धमकी या टोळीने दिली. प्रकरण दाबण्यासाठी आणि बदनामी टाळण्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडे थेट ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली.
‘या’ नऊ जणांवर गुन्हा दाखल
आनंदनगर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये खालील आरोपींचा समावेश आहे:
-
महेश जनार्धन पाटील (रा. कौठा, नांदेड)
-
नवीनकुमार मारुतीराव पाटील (रा. बन्नाळी, धर्माबाद)
-
सुंदरबाई गंगाधर पाटील (रा. देगलूर, नांदेड)
-
शंकर नागोराव खपाटे (रा. बन्नाळी, धर्माबाद)
-
शुंभागी उर्फ साक्षी मच्छिंद्रनाथ वारले (नवरी, रा. वाधी)
-
शिवम खरबुजे (रा. बोधन, निझामाबाद, तेलंगणा)
-
गोरखनाथ वारले, जालींदरनाथ वारले, शुभम वारले (तिघे रा. तानूर, जि. निर्मल, तेलंगणा)
या आंतरराज्य टोळीने अशाच प्रकारे आणखी किती जणांना जाळ्यात ओढले आहे का? याचा तपास आता आनंदनगर पोलिस करत आहेत.






