धाराशिव – सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत आणि फळबागांचे नुकसान झाले आहे, त्यांना महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार वाढीव नुकसान भरपाई थेट खात्यावर जमा करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यासह राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, मूग, मका, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे होऊन शासनाने मदतही जाहीर केली. मात्र, त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा अतिवृष्टी झाली. ऑगस्टमध्ये केवळ पिकांचे नुकसान झाले होते, परंतु सप्टेंबरमधील पावसाने त्याच पिकांखालील जमीन खरडून नेली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान ऑगस्टपेक्षा अधिक झाले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एकदाच मदत देण्याचा नियम आहे. जुलै-ऑगस्टमध्ये मदत मिळाल्याने, सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यास शेतकऱ्यांना अडचण येत आहे. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ऑगस्टमध्येच सर्व क्षेत्र नुकसानग्रस्त दाखवल्याने, सप्टेंबरमध्ये जमीन खरडून गेल्यावरही त्यांना भरपाई मिळण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे.
आमदार कैलास पाटील यांनी निदर्शनास आणून दिले की, जुलै-ऑगस्टमध्ये प्रामुख्याने कोरडवाहू पिकांचे पंचनामे झाले होते. मात्र, सप्टेंबरमधील अतिवृष्टीने फळबागांचेही मोठे नुकसान केले आहे, ज्याचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने केले आहेत. हे नुकसान ऑगस्टच्या तुलनेत अधिक तीव्र असल्याने, सप्टेंबरमध्ये खरडून गेलेल्या जमिनी व फळबागांना पंचनाम्यानुसार भरपाई देणे आवश्यक आहे. याच आधारावर आमदार पाटील यांनी मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे ही मागणी केल्याचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी सांगितले.