नळदुर्ग – अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या नळदुर्ग – अक्कलकोट रस्ता दुरुस्तीच्या कामाची सुरुवात लवकरच होणार असून निविदा पुढील आठवड्यात निश्चित करण्यात येत असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे
राष्ट्रीय महामार्ग ६५२ तुळजापूर – नळदुर्ग – अक्कलकोट या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूरच्या माध्यमातून हाती घेण्यात आले होते. नळदुर्ग – अक्कलकोट या रस्त्यावरील काही भागातील शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्याच्या विषयावरून विरोध दर्शवला होता. सद्यस्थितीत अशा ठिकाणचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी, संबंधित विभागाचे अभियंता, शेतकरी व वकिलांबरोबर अनेक बैठका घेऊन सातत्याने पाठपुरावा चालू होता.
उच्च न्यायालयात हा विषय गेल्यानंतर आ. राणाजगजितसिंहजी पाटील यांनी जुन्या रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग सुचविला होता. अधिकची जागा व त्याचा मोबदला हा विषय स्वतंत्र ठेवून अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या रस्त्याची उपलब्ध रुंदी कायम करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यास उच्च न्यायालयाने मान्यता दिली होती. त्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया सुरु असून 10.80 किमी. लांबीच्या रस्त्यासाठी रु. 3,91,71,811 किमतीच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. निविदा 30 नोव्हेंबर पर्यंत भरण्यात आल्या असून पुढील आठवड्यात निविदा निश्चिती होत लवकरच कमाला सुरुवात होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला हा विषय मार्गी लागल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी
त्याची बातमी धाराशिव लाइव्हसह सर्व वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच, नळदुर्गमधील दलालाना पुन्हा पोटशूळ उठले आहे. नळदुर्ग अक्कलकोट या जुन्या रस्त्याचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर येथील खंडपीठामध्ये न्यायप्रविष्ट आहे. ते प्रकरण न्यायप्रविष्ट असताना या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खंडपीठाने मान्यता दिली व रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया दि.३० नोव्हेंबर रोजी होऊन त्यासाठी निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आ राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. त्यांनी दिलेली माहिती चुकीची, दिशाहीन करणारी, कायदेशीर व रास्त नाही. कारण जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्याची मोजणी दि.१५ जानेवारी २०२४ पर्यंत करून घेऊन त्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठांमध्ये दाखल करण्याचे आदेश दि.५ ऑक्टोबर २०२३ दिलेले आहेत, असे या दलालांचे म्हणणे आहे.
अनेक दिवसापासून रखडलेल्या नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्याच्या दुरूस्ती साठी आ. राणाजगजितसिंहजी पाटील यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध करून देण्यात आला असून दुरुस्तीचे काम मार्गी लागत असल्याने या भागातील ग्रामस्थ व प्रवाशांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे. या कामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय व हेळसांड थांबणार आहे. मात्र काही विघ्नसंतोषी लोक जाणीवपूर्वक यात आडकाटी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या रस्त्यावर आजवर अनेक अपघात झाले आहेत, प्रवाशांच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत, अशा परिस्थितीत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तालुकावासियांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत, मात्र काही जण राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असून अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे, असे भाजपचे तुळजापूर तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांनी म्हटले आहे.
नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्याचे काम मार्गी लागत असताना त्यात आडकाठी आणणाऱ्या दलालांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना हद्दपार करावे, अशी मागणी होत आहे.