तुळजापूर: श्री तुळजाभवानी देवीच्या 108 फुटी भव्य मूर्ती उभारणीवरून सुरू असलेला वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. मंदिर संस्थानाने पुजारी मंडळाला पाठवलेल्या एका पत्रात तुळजाभवानी देवीचा उल्लेख ‘भारताची भारत माता’ असा केल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वादग्रस्त उल्लेखावरून आता प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र शासनाने श्री तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकासासाठी 1865 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. या आराखड्यानुसार, रामदरा तलाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार प्रदान करणाऱ्या श्री तुळजाभवानी आईचे 108 फुटी शिल्प उभारले जाणार आहे. या शिल्पाच्या स्वरूपाबद्दल धर्मशास्त्र आणि परंपरेनुसार मत देण्यासाठी, मंदिर प्रशासनाने 14 जून 2025 रोजी तुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांना एक पत्र पाठवले आहे.
या पत्राची सुरुवातच “श्री तुळजाभवानी माता, भारताची भारतमाता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे,” या वाक्याने करण्यात आली आहे. या शिल्पाच्या मूर्तीचे स्वरूप भारत मातेसारखे असल्याचा आक्षेप यापूर्वीच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह काही पुजारी आणि भाविकांनी घेतला होता. हा वाद शमलेला नसताना, आता थेट प्रशासनानेच देवीचा उल्लेख ‘भारत माता’ असा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मंदिर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे यांच्या सहीने हे पत्र काढण्यात आले आहे. मात्र, या वादग्रस्त उल्लेखाबाबत जिल्हाधिकारी किंवा मंदिर तहसीलदारांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, देवीला ‘भारत माता’ संबोधण्याचा निर्णय नक्की कोणाच्या सांगण्यावरून घेण्यात आला, असा प्रश्न विचारला जात आहे. मूर्तीच्या स्वरूपावरून सुरू असलेल्या वादात या पत्रामुळे अधिकच भर पडली असून, येत्या काळात हा वाद आणखी पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.