धाराशिव | महाराष्ट्रभर गाजलेल्या कै. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा खटला आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तब्बल १४ वर्षे चाललेली प्रदीर्घ सुनावणी, साक्षी-पुराव्यांची तपासणी आणि आरोपींचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला असून, आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ मार्च रोजी होणार असून, त्या दिवशी कोर्ट निकालाची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे.
१६ महिन्यांचा प्लॅन आणि परदेशी शस्त्रांचा वापर


पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यासाठी तब्बल १६ महिने कट रचला गेल्याचे तपासात समोर आले आहे. फेब्रुवारी २००५ मध्ये लातूर येथे रेकी करण्यात आली होती, मात्र तो प्रयत्न फसला. अखेर ३ जून २००६ रोजी कळंबोली येथे ही हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी अतिशय क्रूरपणे पवनराजे यांच्यावर २ गोळ्या झाडल्या, ज्यातील एक त्यांच्या डोक्यात लागली. कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून चालक समद काझी यांच्यावरही १ गोळी झाडण्यात आली. पवनराजे यांच्याकडे स्वतःचे परवानाधारक रिव्हाल्वर होते, मात्र त्यांना ते काढण्याची संधीच मिळाली नाही. या हत्येत ‘मेड इन युएसए’ आणि ‘चायना’ बनावटीची परदेशी शस्त्रे वापरण्यात आली होती.
३ तपास यंत्रणा आणि १२८ साक्षीदार
या हायप्रोफाइल प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस, त्यानंतर सीआयडी आणि शेवटी सीबीआय (CBI) कडे सोपवण्यात आला होता. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी निंबाळकर यांनी कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर सीबीआयने तपासाची चक्रे फिरवली. या खटल्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह एकूण १२८ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत.
२५ लाखांची सुपारी आणि ९ आरोपी
सीबीआयच्या आरोपानुसार, राजकीय कारकीर्द आणि अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे आणि मोहन शुक्ला यांनी २५ लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली. या प्रकरणात एकूण ९ आरोपी आहेत:
१. डॉ. पद्मसिंह पाटील (माजी गृहमंत्री)
२. पारसमल जैन बादला
३. दिनेश तिवारी (शूटर)
४. मोहन शुक्ला (नगरसेवक, मुंबई)
५. सतीश मंदाडे (लातूर)
६. पिंटू सिंग उर्फ महात्मा चौधरी (शूटर)
७. कैलास यादव (बसपा नेता, युपी)
८. शशिकांत कुलकर्णी (माजी उत्पादन शुल्क निरीक्षक)
९. छोटे पांडे
कोर्टाची कडक भूमिका:
शूटर पिंटू सिंग सध्या बिहारच्या सिवान कारागृहात आहे, त्याला हजर करण्यासाठी कोर्टाने वॉरंट काढण्याचे आदेश दिले आहेत. इतर आरोपी जामिनावर असून, हजेरीसाठी टाळाटाळ करणाऱ्या आरोपींना कोर्टाने कडक तंबी दिली असून २४ मार्चला सर्व संशयितांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
एकूण १,२५० पानांचे लेखी म्हणणे कोर्टासमोर मांडण्यात आले आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वतीने पवनराजे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले असून, हे प्रकरण राजकीय द्वेषातून गोवल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, सीबीआयने मांडलेले पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष पाहता कोर्ट काय निकाल देते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






