उमरगा: उमरगा शहरात सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर आणि शासकीय वाहनांच्या वापरातील अपारदर्शकता यावर सामाजिक कार्यकर्ते ॲड. शीतल चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या गंभीर मुद्द्यानंतर अवघ्या २४ तासांत नगर परिषद प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औराद (गु.) येथे विजेची वायर लांबवणाऱ्या ३ भामट्यांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असले, तरी या घटनेत नगर परिषदेच्या कचरा गाडीचा संशयास्पद वापर झाल्याचा आरोप होत असल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
कालच ॲड. शीतल चव्हाण यांनी हुतात्मा स्मारक परिसरात नगर परिषदेच्या गाड्या उघड्यावर कुजत पडल्याचा आणि शासकीय वाहनांच्या वापराबाबत अपारदर्शकता असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला होता. हा मुद्दा चर्चेत असतानाच, शहरात नागरिकांना वेळेवर कचरा गाडी मिळत नसताना, काल सायंकाळी नगर परिषदेची अधिकृत कचरा गाडी थेट शहराबाहेर मौजे औराद (गु.) येथे आढळून आली.
औराद व जकेकुर तळ्याच्या पाळीवरून विजेच्या मोटारीची १५० फूट वायर चोरी करून नेणाऱ्या कृष्णा खराते, आकाश बनसोडे व व्यंकटेश दाते या ३ संशयितांना औरादच्या ग्रामस्थांनी मंदिराजवळ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यांच्यावर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा (कलम १२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम) दाखल झाला आहे.
नगर परिषदेच्या वाहनाचा वापराबाबत मुख्य प्रश्न
या कारवाईनंतर स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून नगर परिषद प्रशासनाला थेट सवाल विचारले जात आहेत:
-
नियमित कचरा संकलनासाठी अपुरी पडणारी नगर परिषदेची अधिकृत गाडी शहराबाहेर औरादला नेमकी कोणाच्या आदेशाने गेली?
-
चोरीच्या या संशयास्पद प्रकरणात शासकीय वाहनाचा वापर कोणाच्या संमतीने झाला?
सखोल चौकशीची मागणी
हे प्रकरण केवळ वायर चोरीपुरते मर्यादित नसून सार्वजनिक मालमत्तेचा आणि शासकीय वाहनांचा अनधिकृत गैरवापर दर्शवणारे आहे. “जनतेच्या करातून खरेदी केलेली वाहने खाजगी किंवा संशयास्पद कामांसाठी वापरली जात असतील, तर प्रशासनातील जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ, निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.






