धाराशिव: नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी धाराशिव जिल्ह्यात होणाऱ्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “आम्ही आमच्या जमिनी देणार नाही,” अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी १९ गावांतील बाधित शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आणि मागण्या लक्षात घेऊन, सध्या सुरू असलेली जमिनीची मोजणी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तात्काळ थांबवण्यात आली आहे. “शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय महायुती शासन कोणताही पुढील निर्णय घेणार नाही,” अशी स्पष्ट ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या विविध समस्या, शंका आणि मागण्या मोकळेपणाने मांडल्या. अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन कागदोपत्री ‘जिरायत’ असली तरी प्रत्यक्षात ती ‘बागायती’ म्हणून वापरली जात असल्याचे सांगितले. त्यामुळे मोबदला ठरवताना जमिनीचे स्वरूप ‘बागायती’ म्हणूनच विचारात घ्यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यावर आमदार पाटील यांनी योग्य ती पडताळणी करून असे क्षेत्र बागायतीच समजले जाईल, असे आश्वासन दिले.
तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी गावातील सुमारे ८० टक्के शेतकरी या प्रकल्पामुळे भूमिहीन होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. “जमिनी गेल्यावर आमचं भवितव्य काय?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या गंभीर विषयावर तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबईत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य पर्याय काढण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले. तसेच, बाधित शेतकऱ्यांना प्रचलित दराचा विचार करून न्याय्य मोबदला देण्याबाबत शासन सहानुभूतीने विचार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘काहीजण राजकारण करत आहेत’ – आमदार पाटील
या विषयाचे काही लोक राजकारण करत असून, चुकीची माहिती पसरवून शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत, असा आरोप आमदार पाटील यांनी केला. शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, वास्तव माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) अधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेतील आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.