धाराशिव: शिवसेना ठाकरे गटाचे चार नगरसेवक शिवसेना शिंदे गटात सामील झाल्यानंतर धाराशिवमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षांतराचा हा झटका ठाकरे गटासाठी मोठा मानला जात असतानाच, आता शहरात लागलेल्या आक्षेपार्ह बॅनरमुळे एकच खळबळ उडाली आहे. समता नगर परिसरात लावण्यात आलेल्या एका होर्डिंगवर पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांचा ‘गद्दार’ असा थेट उल्लेख करण्यात आला असून, त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
‘१ कोटीचा गद्दार’
समता नगरमध्ये लागलेले हे होर्डिंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या होर्डिंगवर “१ कोटीचा गद्दार” असे मोठ्या अक्षरात लिहिले असून, ‘एक कोटी’ आणि ‘गद्दार’ या शब्दांभोवती गोल करून लाल रंगात शिक्का मारण्यात आला आहे. बॅनरच्या डाव्या बाजूला एका फोटोवर ‘X’ असे चिन्ह करून संताप व्यक्त केला आहे. त्याखाली “१ खोका मतदाराला दिला धोका…”, “१ समताचा दाढीवाला बोका” असे अत्यंत कडक आणि आक्रमक शब्द वापरण्यात आले आहेत.

‘आमचं मत आम्हाला परत द्या’
या होर्डिंगवर प्रभाग क्र. ९ च्या उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगरसेवकांना उद्देशून “आमचं मत आम्हाला परत द्या.!” अशी मागणी करण्यात आली आहे. मतदारांनी विश्वासाने दिलेल्या मताचा अपमान झाला असल्याची भावना यातून व्यक्त होत आहे. होर्डिंगच्या खालच्या भागात “सोसायटी लुटली, तिजोरी फोडली, एक कोटी घेऊन, निष्ठा विकली!” असे गंभीर आरोप नगरसेवकांवर करण्यात आले आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
भाजप की ठाकरे गट?
या वादग्रस्त बॅनरबाजीमुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. हे होर्डिंग भाजप कार्यकर्त्यांनी लावले की शिवसेना ठाकरे गटाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही जणांचे म्हणणे आहे की, हे होर्डिंग भाजपच्या वतीने लावून शिंदे गटाला लक्ष्य केले जात आहे, तर काहींच्या मते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आपला संताप अशा प्रकारे व्यक्त केला आहे. अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा संघटनेने या होर्डिंगची अधिकृत जबाबदारी स्वीकारलेली नाही.
या चार नगरसेवकांच्या पक्षांतरामुळे धाराशिवमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यातच या बॅनरबाजीमुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे. आगामी काळात या प्रकरणाचे काय पडसाद उमटतात आणि पोलीस यावर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मतदारांमध्ये निर्माण झालेली नाराजी आणि राजकीय पक्षांमधील अंतर्गत कलह यामुळे धाराशिवचे राजकारण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.




