तुळजापूर – तालुक्यातील तामलवाडी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) नियोजित प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या एका अर्जात, शेतकऱ्यांनी आपली जमीन वडिलोपार्जित असल्याचे सांगत ती कोणत्याही परिस्थितीत संपादित करू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, तामलवाडी येथील नियोजित MIDC साठी जमीन संपादित करण्याकरिता त्यांना शासकीय व निमशासकीय बैठकांसाठी वारंवार बोलावले जात आहे. यापूर्वी २० ऑगस्ट २०२४, २३ जानेवारी २०२५ आणि २२ मे २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, धाराशिव यांना याबद्दल लेखी आणि तोंडी कळवूनही या बैठका सुरूच असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, ते कोणत्याही प्रकारच्या सरकारी मोबदल्याचा विचार करत नाहीत. निवेदनात म्हटले आहे की, “आमच्या जमिनी वडिलोपार्जित व आम्ही सर्व भूमिहीन होणार असल्यामुळे आम्हाला मोबदल्याची कोणतीही अपेक्षा नाही.” या कारणामुळे, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी औद्योगिक महामंडळासाठी देणार नसल्याचे ठामपणे सांगितले आहे.
या प्रक्रियेला शेतकऱ्यांची संमती नसल्यामुळे, यापुढे कोणत्याही बैठकीसाठी बोलावण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. या एकत्रित विरोधामुळे तामलवाडीतील MIDC भूसंपादनाचा मार्ग खडतर होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांचं जमिनी उद्योगपतीच्या घश्यात घालण्याचा एका राजकीय नेत्याचा डाव असून, या उद्योगपतीबरोबर त्यांची पार्टनरशिप असल्याची चर्चा सुरु आहे.