मुंबई: लाखो हिंदू भाविकांचे कुलदैवत असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या ४ हजार १२१ एकरपेक्षा अधिक इनामी जमिनीच्या अनधिकृत हस्तांतरण आणि विक्री प्रकरणाची आता राज्य शासनामार्फत चौकशी केली जाणार आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी दिलेल्या सविस्तर निवेदनाची गंभीर दखल घेत, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशीवच्या जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी तातडीने चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे महाराष्ट्र मंदिर महासंघाने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
नेमका घोटाळा काय आहे?
-
तत्कालीन निजाम शासनाने श्री तुळजाभवानी देवीला १ सहस्र ६६६.१४ हेक्टर (सुमारे ४ हजार १२१.१४ एकर) जमीन इनाम म्हणून दिली होती.
-
कायद्यानुसार या इनामी जमिनीची खरेदी-विक्री होऊ शकत नाही आणि याला ‘कुळ कायदा’ देखील लागू होत नाही.
-
असे असतानाही महसूल अधिकारी आणि अन्य व्यक्तींच्या संगनमताने हजारो एकर जमीन लाटण्यात आल्याचा आरोप आहे.
-
श्री तुळजाभवानी संस्थानच्या नावे कागदोपत्री ३ हजार ३९७ एकर भूमी असली, तरी प्रत्यक्ष ताबा मात्र चार मठांमधील खाजगी व्यक्तींकडे आहे.
-
जगदंबा न्यासाच्या नावे असलेली ४०३ एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट खाजगी व्यक्तींच्या नावे करण्यात आली आहे.
-
कायद्याचे उल्लंघन करून ६३.०३ एकर जमिनीपैकी काही जमीन ‘संरक्षित कुळ’ दाखवून अनधिकृतपणे विकण्यात आली.
-
एका अव्वल कारकुनाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत २६१ एकर जमीन तब्बल ७३ खाजगी व्यक्तींच्या नावे ७/१२ वर नोंदवल्याचा प्रकार समोर आला आहे.
-
याशिवाय अपसिंगा आणि उफळा या गावांमधील १५८ एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करून लाटण्यात आली आहे.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रमुख मागण्या:
-
या बेकायदेशीर हस्तांतरणात सामील असलेले तत्कालीन उपजिल्हाधिकारी, विश्वस्त आणि संबंधित मोठ्या लोकांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत.
-
शासनाने विशेष अधिकारांचा वापर करून या जमिनींची सर्व अनधिकृत खरेदीखते आणि ७/१२ वरील नोंदी तत्काळ रद्द कराव्यात.
-
संपूर्ण १ हजार ६६६.१४ हेक्टर जमीन पुन्हा श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रत्यक्ष नियंत्रणात घेण्यात यावी.
या महाघोटाळ्याची आता सखोल चौकशी होणार असल्याने, या प्रकरणात गुंतलेले अनेक मोठे चेहरे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






