महाराष्ट्राची कुलस्वामिनी, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानीच्या पावन नगरीला आज गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचे ग्रहण लागले आहे. ज्या भूमीत लाखो भाविक श्रद्धेने नतमस्तक होतात, ती तुळजापूर नगरी आज मटका, गुटखा, चोऱ्या, दरोडे आणि लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायाने बदनाम होत आहे. अत्यंत क्लेशदायक बाब म्हणजे, हे आरोप कोणते विरोधक किंवा परके करत नसून, खुद्द तुळजापूरचे नगराध्यक्ष पिंटू उर्फ गंगणे आणि नगरसेविका प्रियंका गंगणे यांनी जाहीरपणे केले आहेत. तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी यावर निवेदन दिले होते. परंतु, तुळजापूर पोलिसांची ‘खाबुगिरी’ सुटायला तयार नाही. गुटखा आणि मटका बहाद्दरांकडून कोण, किती वसुली करतो, याची इत्थंभूत आकडेवारीच आता समोर आली आहे. मग प्रश्न पडतो, तुळजापुरात कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करायचे की अवैध धंदेवाल्यांचे खिसे भरायचे, असा नवा नियम पोलिसांनी लागू केला आहे का?
या सगळ्या पापात भर घालत आहे ती येथील पोलीस प्रशासनाची दडपशाही! तुळजापूरमधील वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध आणि अवैध धंद्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते पंकज शहाणे हे व्हिडिओच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवत होते, पीडितांचे अश्रू जगासमोर आणत होते. वास्तविक पाहता, पोलिसांनी या माहितीची दखल घेऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करायला हवी होती. परंतु, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी शहाणे यांनाच पोलीस ठाण्यात बोलावून दमबाजी केली, त्यांचा जाहीर अपमान केला. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील पोलिसांचा बाणा असूच शकत नाही.
विरोधाभास पाहा कसा आहे– ज्याच्यावर १७ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा नामचीन जुगार अड्डा चालवणाऱ्या गुंडाला मात्र हेच पोलीस निरीक्षक मांजरे ‘हाजी-हाजी’ करतात, त्याला पोलीस ठाण्यात सन्मानाने बसवतात आणि कोणाची तक्रार आली तर ती गुंडाला दाखवून तक्रारदारालाच धोक्यात आणतात! हा थेट गुन्हेगारांना दिलेला राजाश्रय नाही तर काय? खाकी वर्दीची ही कसली लाचारी?
या खाकी वर्दीच्या अरेरावीविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध अखेर तुळजापूरची जनता, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, राजकीय नेते आणि मानकरी पुजारी एकत्र आले आहेत. पंकज शहाणे यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि तुळजापूरला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी गेल्या नऊ दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. संपूर्ण शहर रस्त्यावर उतरले आहे, रोज पोलीस प्रशासनाच्या नावाने शिमगा सुरू आहे. या आंदोलकांची मागणी अत्यंत रास्त आणि सरळ आहे– पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आणि पोलीस उपाधीक्षक निलेश देशमुख यांची तात्काळ हकालपट्टी (उचलबांगडी) झालीच पाहिजे!
परंतु, नऊ दिवस उलटूनही वरिष्ठ पोलीस अधिकारी ढिम्म आहेत. जनतेच्या या संतापाची दखल घेण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळ नाही. “वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गेंड्याची कातडी पांघरली आहे का?” असा संतप्त प्रश्न आज प्रत्येक तुळजापूरकर विचारत आहे. जर संपूर्ण शहर एका अधिकाऱ्याविरुद्ध बंड पुकारत असेल, तर वरिष्ठ अधिकारी कोणाला पाठीशी घालत आहेत?
पोलीस खाते हे जनतेच्या रक्षणासाठी असते, गुन्हेगारांच्या पोषणासाठी नाही. जर पोलीस निरीक्षक मांजरे आणि डीवायएसपी निलेश देशमुख यांना ‘जनाची नाही तर मनाची’ तरी लाज उरली असेल, तर त्यांनी स्वतःहून आपली बदली करून येथून चालते व्हावे. अन्यथा, तुळजापूरच्या जनतेचा हा संताप संपूर्ण जिल्ह्याला कवेत घेतल्याशिवाय राहणार नाही, हे गृहखात्याने आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच ओळखावे! तुळजाभवानीच्या नगरीत चालणारा हा पापी कारभार आता कदापि सहन केला जाणार नाही!






