धाराशिव: राजकारणात ‘टायमिंग’ आणि ‘स्पीड’ किती महत्त्वाचा असतो, याचं सर्वात ताजं आणि धगधगतं उदाहरण धाराशिवमध्ये पाहायला मिळालं आहे. ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कालच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला; आणि २४ तास उलटायच्या आतच धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेची संपूर्ण जुनी कार्यकारिणी थेट मोडीत काढण्यात आली आहे!
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने जारी केलेल्या या पत्राने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
⚡ पक्षात येताच ओमराजेंचा ‘फ्री-हँड’ पॅटर्न!
साधारणपणे कोणताही मोठा नेता पक्षात आल्यानंतर परिस्थिती समजून घेण्यासाठी काही दिवस घेतो. पण ओमराजे निंबाळकर यांच्या बाबतीत तसं घडलेलं नाही. काल त्यांचा प्रवेश झाला आणि आज थेट हे पत्र समोर आलं. मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिलासेना आणि सर्व अंगीकृत संघटनांची कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त करण्यात आली आहे.


या ‘सुसाट’ वेगामुळे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत:
१. ओमराजेंचा वाढलेला दबदबा: पक्षात येताच जुनी संघटना बरखास्त करून घेणं, यावरून ओमराजेंना धाराशिव जिल्ह्याची पूर्ण सूत्रं आणि ‘फ्री-हँड’ देण्यात आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
२. नव्या जुन्यांचा मेळ की नवी फळी? आता लवकरच जिल्ह्यात नवीन कार्यकारिणीची निवड केली जाणार असून, यामध्ये ओमराजेंच्या निष्ठावंतांना मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
🛑 राणा पाटील समर्थकांना दणका; अजित पिंगळेंची हकालपट्टी!
या संपूर्ण घडामोडीत सर्वात मोठा झटका आमदार राणा पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे प्रभारी जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांची तडकाफडकी पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. ओमराजेंच्या प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी पिंगळेंना घरचा रस्ता दाखवल्यामुळे धाराशिवच्या राजकीय समीकरणांना आता पूर्णपणे कलाटणी मिळाली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पिंगळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी देऊन, मोठा पेच तयार केला होता. त्याचबरोबर पिंगळे यांनी पक्षश्रेष्ठीला न विचारता काही पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या केल्या होत्या. अजित पिंगळे आणि भाजप आमदार राणा पाटील यांचे मधुर संबंध असल्याचे सर्वश्रुत आहे.
थोडक्यात काय तर… काल प्रवेश आणि आज थेट जुनी संघटना साफ! ओमराजेंनी महायुतीत येताच आपला ‘उद्रेक’ दाखवायला सुरुवात केली आहे. आता या नव्या वादळात धाराशिवच्या राजकारणाची धुरा कोणाकडे जाते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत!







