अहो आश्चर्यम्! महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यवधी जनांचं श्रद्धास्थान असलेल्या आई तुळजाभवानीच्या तुळजापुरात सध्या भक्तीपेक्षा भलत्याच गोष्टींचा बाजार गरम आहे राव! म्हणजे बघा ना, एकीकडे आईच्या दर्शनासाठी सामान्य भाविक तासंतास, अगदी १२-१२ तास रांगेत तिष्ठत उभा, तर दुसरीकडे ‘खास’ लोकांसाठी अवघ्या ५ मिनिटांत दर्शनाचा ‘व्हीआयपी पास’ हजर! यालाच म्हणतात कलियुग!
आधीच तुळजापूर १७ पुजाऱ्यांच्या ड्रग्ज कनेक्शनमुळे भलतंच ‘फेमस’ झालं होतं. देवीच्या नावानं चांगभलं म्हणायचं सोडून काही पठ्ठ्यांनी थेट ‘उच्च’ कोटीच्या धुंदीचा मार्ग पत्करला होता म्हणे! त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, ते प्रकरण शांत होतंय न होतंय, तोच आता व्हीआयपी पासचा नवा घोटाळा उघडकीस आलाय.
आता गंमत बघा, मंदिर संस्थानचे अध्यक्ष कोण? तर आपले जिल्हाधिकारी साहेब! आणि विश्वस्त कोण? तर आपले स्थानिक भाजप आमदार राणा पाटील! मग काय, राजकारण तर आलंच पाहिजे ना बॉस! विश्वस्तांच्या नावानं रोज तब्बल ५० व्हीआयपी पास छापले जातात. म्हणजे ५० लोक रोज देवाच्या दर्शनाची लाईन ‘कट’ मारून थेट पुढे! आणि हे पास म्हणे आमदारांचे कार्यकर्ते १ हजार ते ५ हजार रुपयांना विकून स्वतःची ‘पोळी’ भाजून घेतायत, असा थेट आरोप केलाय शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी.
पण खरी फिरकी तर पुढे आहे! हे व्हीआयपी पास पंचिंग न करताच वापरले जातात म्हणे! म्हणजे काय, एकदा वापरलेला पास पुन्हा बाहेर येतो, आणि परत कुणालातरी विकला जातो. असा एक पास कमीतकमी दहा वेळा तरी वापरला जातोय, असं विरोधकांचं म्हणणं आहे. म्हणजे हा पास आहे की अक्षयपात्र? एकदा घेतला की फिरवतच रहा! याला म्हणतात ‘सर्क्युलर इकॉनॉमी’चं तुळजापूर मॉडेल!
खासदार साहेब आणि आमदार साहेबांनी सोमवारी थेट जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनाच धारेवर धरलं आणि विचारलं, “साहेब, हे काय चाललंय? गोरगरिबांनी रांगेत मरायचं आणि पैसेवाल्यांनी, कार्यकर्त्यांनी देवीच्या नावावर असा बाजार मांडायचा?” त्यांनी हे पास तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.
आणि मागणी पण योग्यच आहे म्हणा. तुळजापुरात येतात कोण? तर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक! त्यात काही गडगंज श्रीमंतही असतात. त्यांना दर्शनाची ओढ असते, पण रांगेत उभं राहायची सवय नसते आणि वेळही नसतो. मग असे लोक हजार काय, पाच-दहा हजार रुपयेही मोजायला तयार होतात. चार-पाच जणांचं कुटुंब आलं की झाला की नाही गल्लाभरू कार्यक्रम!
या सगळ्यातून तुळजापुरात पैशाचा महापूर आलाय, असं म्हटलं जातंय. आणि याच ‘इझी मनी’मुळे काही तरुण पुन्हा ड्रग्जसारख्या वाईट गोष्टींच्या आहारी जात असल्याचाही संशय आहे. म्हणजे बघा, व्हीआयपी पासच्या काळ्या बाजारातून आलेला पैसा शेवटी नशेच्या धंद्यात? देवा रे देवा!
एकंदरीत काय, तर तुळजापुरात सध्या ‘श्रद्धा’ आणि ‘सबुरी’ या शब्दांना ‘अर्थ’पूर्ण पर्याय निर्माण झाले आहेत. आता देवी आई तुळजाभवानीच या सगळ्या पासच्या काळ्या बाजाराला आणि वाढत्या ‘अर्थ’कारणाला कसा आशीर्वाद देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल! तोपर्यंत सामान्य भाविकांनी रांगेत उभं राहून ‘आईचा जोगवा’ मागत राहावा!