उमरगा – येथील एमआयडीसीतील एका व्यापाऱ्याला गुजरातला पाठवलेला नऊ लाख ८४ हजार रुपयांचा तांदूळ परस्पर विकून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडु शिवाजी कांबळे (रा. लातूर), अमोल उर्फ दिलीप काशिनाथ घुमनसुरे (रा. पद्मा नगर, लातूर) आणि काशिनाथ किसन बन (रा. गंगाधाम ट्रान्सपोर्ट बायपास रिंगरोड, खान कॉम्प्लेक्स, लातूर) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रकाशकुमार आप्तगीरी यांच्या मालकीच्या श्री लक्ष्मी नरसिंम्हा स्वामी ट्रेडर्स या उमरगा एमआयडीसीतील कंपनीतून २१ मे २०२५ रोजी ‘एमएच २५ एयु ९०९२’ या ट्रकमध्ये तांदळाची ५० किलो वजनाची ७०६ पोती (एकूण ३५ टन) भरण्यात आली होती. या तांदळाची एकूण किंमत ९ लाख ८४ हजार ८७० रुपये होती. हा माल गुजरातमधील सानंद येथील रतन ऍग्रो कंपनीत पोहोचवायचा होता.
आरोपींनी संगनमत करून कट रचला. त्यांनी गुजरातमधील रतन ऍग्रो कंपनीत फक्त ६ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा माल उतरवला. उर्वरित २ लाख ८७ हजार ३७० रुपये किमतीचा सुमारे १० टन ३ क्विंटल वजनाचा तांदूळ (२०६ पोती) गाडीच्या सेन्सरमध्ये बिघाड झाल्याचे कारण सांगून कंपनीबाहेर काढला. त्यानंतर या मालाची परस्पर विल्हेवाट लावून आरोपींनी अपहार केला आणि व्यापाऱ्याची फसवणूक केली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रकाशकुमार आप्तगीरी यांनी २८ जून २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२), आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.