धाराशिव – वंचित बहुजन आघाडीने पक्ष शिस्तभंगाची गंभीर दखल घेत धाराशिव जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. पक्षाला विश्वासात न घेता परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेतल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांनी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आर. एस. गायकवाड आणि कळंब तालुका अध्यक्ष कुणाल म्हस्के यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
-
आर. एस. गायकवाड (जिल्हा उपाध्यक्ष): गायकवाड हे तुळजापूर तालुक्यातील अणदूर पंचायत समिती गणातून पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे होते. मात्र, पक्षाला कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा विश्वासात न घेता त्यांनी परस्पर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
-
कुणाल म्हस्के (कळंब तालुका अध्यक्ष): म्हस्के यांनी डिकसळ जिल्हा परिषद गटातून त्यांच्या मातोश्री शोभा प्रकाश मोहिते यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे केले होते. त्यांनी देखील पक्षाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला.
या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयामुळे पक्षाची नाहक बदनामी झाली असल्याचे ‘वंचित’ने म्हटले आहे. त्यांची ही कृती पक्ष शिस्तभंग करणारी आणि पक्षविरोधी असल्याने त्यांना पदमुक्त करून ‘वंचित बहुजन आघाडी’तून निलंबित करण्यात आले आहे.
या निर्णयाची नोंद जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घ्यावी, अशा सूचना महासचिव किसन चव्हाण यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.







