बेंबळी – धाराशिव तालुक्यातील महाळंगी येथे शेतीच्या वादातून एका ५० वर्षीय महिलेला शिवीगाळ करत काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेचे नाव चंद्रकला शंकर हिंगले (वय ५०, रा. महाळंगी) असे आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना २२ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास महाळंगी शिवारातील गट क्रमांक ७८ मध्ये घडली. शेतीच्या जुन्या वादातून आरोपी सुरज शिवाजी बिरु हिंगले, जयश्री शिवाजी हिंगले आणि सोमनाथ शिवाजी हिंगले (सर्व रा. महाळंगी) यांनी चंद्रकला हिंगले यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, “तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर चंद्रकला हिंगले यांनी २८ जून रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२),(३), आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.