मुरुम : उमरगा तालुक्यातील तुगाव शिवारात शेतजमिनीच्या वादातून एका दाम्पत्याला तिघा जणांनी मिळून जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत पती-पत्नी दोघांचेही हात फ्रॅक्चर झाले असून, त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल दिनकर मिसाळ (वय ४२ वर्षे, रा. तुगाव, ता. उमरगा) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ही घटना १ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास तुगाव शिवारातील त्यांच्या शेतात घडली. शेतीच्या जुन्या वादातून आरोपी महेश दिनकर साळुंके, मयुर अशोक स्वामी आणि प्रविण विनायक साळुंके (सर्व रा. तुगाव, ता. उमरगा) यांनी अनिल मिसाळ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि त्यांचा हात पिरगळून फ्रॅक्चर केला. हे भांडण सोडवण्यासाठी अनिल मिसाळ यांची पत्नी पुढे आल्या असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण करत त्यांचा डावा हात पिरगळून फ्रॅक्चर केला. तसेच, आरोपींनी मिसाळ दाम्पत्याला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर अनिल मिसाळ यांनी ३ एप्रिल २०२५ रोजी मुरुम पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी महेश साळुंके, मयुर स्वामी आणि प्रविण साळुंके या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३५१(३), ३(५) अन्वये मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे आणि धमकी देणे या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.