नळदुर्ग: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे मागील भांडणाचा राग मनात धरून एका ४० वर्षीय महिलेला त्याच गावातील दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना ३१ मार्च रोजी रात्री घडली असून, याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ३ एप्रिल) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मी दिलीप मेंढापुरे (वय ४० वर्षे, रा. चिवरी, ता. तुळजापूर) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३१ मार्च २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्या चिवरी गावात असताना, गावातीलच अजय भागवत मिसाळ आणि मायावती भागवत मिसाळ यांनी मागील भांडणाचे कारण काढून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर दोघांनी संगनमत करून लक्ष्मी मेंढापुरे यांना लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण केली, ज्यामुळे त्या जखमी झाल्या. या घटनेनंतर लक्ष्मी मेंढापुरे यांनी ३ एप्रिल २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अजय भागवत मिसाळ आणि मायावती भागवत मिसाळ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.