धाराशिव – धाराशिव शहरातील मिल्ली कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेला आणि तिच्या दिराला सहा जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना २५ एप्रिल रोजी रात्री घडली. या हल्ल्यात महिलेचा दीर चाकू लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सहा आरोपींविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वशीमा मोहशीन कुरेशी (वय २८ वर्षे, रा. मिल्ली कॉलनी, धाराशिव) यांनी २८ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार, २५ एप्रिल रोजी रात्री सुमारे ८ वाजता मिल्ली कॉलनी येथे आरोपी आयान मुन्ना कुरेशी, सोहेल कुरेशी, आलीशा कुरेशी, बेबी कुरेशी, सिरास कुरेशी आणि सोनु कुरेशी (सर्व रा. मिल्ली कॉलनी, धाराशिव) यांनी गैरकायदेशीरपणे एकत्र जमून वशीमा कुरेशी यांना मागील भांडणावरून शिवीगाळ केली. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
यावेळी वशीमा यांचा दीर भांडण सोडवण्यासाठी मध्ये आला असता, आरोपींनी त्याला लोखंडी चाकूने मारहाण केली, ज्यात तो गंभीर जखमी झाला. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या दिराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
वशीमा कुरेशी यांनी दिलेल्या या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.