धाराशिव: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर धाराशिव शहरात एका भरधाव आणि निष्काळजीपणे चालवलेल्या मारुती स्विफ्ट कारने मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ओव्हन हॉटेलसमोरील पुलावर घडली. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात ४ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत तरुणाचे नाव सचिन विजयकुमार सर्जे (रा. शाहूनगर, ता.जि. धाराशिव) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सर्जे हे १ जून रोजी दुपारी आपल्या मोटरसायकलवरून संभाजीनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून धाराशिवच्या दिशेने जात होते. ते ओव्हन हॉटेलसमोरील पुलावर आले असता, पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मारुती स्विफ्ट कार (क्र. एमएच ०४ एफझेड ९८४०) ने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, सचिन सर्जे गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक खंडू रामहरी कोळी (रा. धाराशिव, ता.जि. धाराशिव) याच्यावर निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी मयत सचिन यांचे बंधू बालाजी विजयकुमार सर्जे (रा. शाहूनगर, ता.जि. धाराशिव) यांनी ४ जून २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी कारचालक खंडू रामहरी कोळी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१ (अविचारी किंवा निष्काळजीपणे वाहन चालवणे), १२५(अ) (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत होणे), १२५(ब), १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम १३४(अ)(ब) (अपघातग्रस्तांना मदत न करणे व माहिती न देणे) आणि १८४ (धोकादायकरीत्या वाहन चालवणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. आनंदनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.