तुळजापूर: श्री तुळजाभवानी देवीचा उल्लेख ‘भारताची भारत माता’ असे करणारे वादग्रस्त पत्र अखेर श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने मागे घेतले आहे. ‘धाराशिव लाइव्ह’ने या पत्रासंदर्भात बातमी प्रसिद्ध केल्यानंतर आणि पुजारी मंडळाने तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, आता एक सुधारित पत्र जारी करण्यात आले आहे.
काय होते प्रकरण?
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाने 14 जून 2025 रोजी श्री तुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळाला एक पत्र पाठवले होते. नियोजित विकास आराखड्यात रामदरा तलाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देणाऱ्या आई तुळजाभवानीचे 108 फुटी शिल्प उभारले जाणार आहे. या शिल्पाच्या स्वरूपाविषयी मत मागवण्यासाठी हे पत्र पाठवण्यात आले होते. मात्र, या पत्रात प्रशासनाने श्री तुळजाभवानी माता, भारताची भारतमाता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे,” असा उल्लेख केला होता.
या उल्लेखावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आधीच मूर्तीच्या स्वरूपावरून मतभेद असताना, प्रशासनानेच देवीला ‘भारत माता’ संबोधल्याने पुजारी मंडळ आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
आक्षेपानंतर प्रशासनाची माघार
‘धाराशिव लाइव्ह’ने या वृत्ताला प्रसिद्धी दिल्यानंतर आणि पुजारी मंडळाने या उल्लेखावर अधिकृतपणे आक्षेप घेतल्यानंतर, मंदिर प्रशासनाने तातडीने दखल घेतली. तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे यांच्या स्वाक्षरीने निघालेले ते वादग्रस्त पत्र मागे घेण्यात आले. प्रशासनाने आपली चूक मान्य करत पुजारी मंडळाला एक नवीन, सुधारित पत्र पाठवले आहे. या नव्या पत्रातून वादग्रस्त उल्लेख वगळण्यात आल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे सध्या निर्माण झालेल्या वादावर पडदा पडला आहे.