मुरुम : उमरगा तालुक्यातील दाळींब शिवारात एका भरधाव आणि निष्काळजीपणे चालवलेल्या कारच्या धडकेत दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून, याप्रकरणी म्हशी मालकाच्या तक्रारीवरून सोलापूर येथील कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामपूर (ता. उमरगा) येथील शेतकरी बंकट धोंडीबा भोसले (वय ५५) यांचा मजूर संदानी मुंडे हा त्यांच्या म्हशींना नेहमीप्रमाणे चरायला घेऊन गेला होता. २५ जून रोजी दुपारी एकच्या सुमारास, दाळींब शिवारातील एमएच ६५ रस्त्यावर राम देडे यांच्या शेताजवळ म्हशी चरत होत्या.
त्यावेळी सोलापूरकडून येणाऱ्या कार (क्र. एमएच १३ डीवाय ३५५८) चालकाने अत्यंत वेगात आणि हयगयीने गाडी चालवत रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन म्हशींना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही म्हशींचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी म्हशींचे मालक बंकट भोसले यांनी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून कारचालक शंकरसिंग गोकुळसिंग परदेशी (रा. मारुती पेठ, सोलापूर) याच्या विरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून प्राण्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.