धाराशिव – पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून एका ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील आळणी गावात घडली आहे. याप्रकरणी मयताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
तानाजी नानासाहेब भराडे (वय ४०, रा. आळणी, ता. जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, दिनांक २९ जुलै २०२५ रोजी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास तानाजी भराडे यांनी आळणी शिवारातील अंकुश तांबे यांच्या शेतामधील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
या प्रकरणी मयत तानाजी यांचे मोठे बंधू बालाजी नानासाहेब भराडे (वय ४४) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, तानाजी यांची पत्नी अनुराधा तानाजी भराडे आणि बालाजी सुरेंद्र घाडगे (रा. धाराशिव) यांचे अनैतिक संबंध होते. या संबंधांवरून दोघे मिळून तानाजी यांना सातत्याने मानसिक त्रास देऊन टॉर्चर करत होते. याच त्रासाला कंटाळून तानाजी यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
बालाजी भराडे यांच्या तक्रारीवरून, धाराशिव ग्रामीण पोलिसांनी आरोपी अनुराधा भराडे आणि बालाजी घाडगे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०८ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे आळणी गावावर शोककळा पसरली आहे.