भूम : “हे घर आमचे आहे, तू इथे यायचे नाही” असे म्हणत एका महिलेला काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना भूम तालुक्यातील पाथरुड येथे घडली आहे. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली सुनील पौळ (वय ३६, रा. पाथरुड, ता. भूम) या शनिवारी (दि. २० डिसेंबर) दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास पाथरुड येथे होत्या. यावेळी आरोपी सुमन थोरात, दैवशाला कचरू पौळ, रत्नमाला कमलाकर पौळ, सतीश कचरू पौळ आणि इतर एक अनोळखी व्यक्ती (सर्व रा. पाथरुड) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी अंजली यांना गाठले.
“हे घर आमचे आहे, तू इथे यायचे नाही,” असे म्हणून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच यावेळी जिवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.
याप्रकरणी जखमी अंजली पौळ यांनी मंगळवारी (दि. २३ डिसेंबर) भूम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील पाच आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास भूम पोलीस करत आहेत.






