धाराशिव: जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, तुळजापूर, उमरगा, लोहारा येथे महायुती तर भूम- परंड्यात मात्र भाजप आमदार राणा पाटील यांनी युतीधर्माला उघडपणे तिलांजली दिल्याचे चित्र आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांना राजकीय धडा शिकवण्यासाठी राणा पाटील यांनी थेट त्यांच्याच घरात फूट पाडल्याची चर्चा आहे. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना ताकद (रसद) पुरवत राणा पाटलांनी सावंतांना ‘चेकमेट’ देण्याचा प्रयत्न केला आहे.
मागील अपमानाचा आणि जुन्या पराभवाचा वचपा?
मागील सरकारच्या काळात तानाजी सावंत राज्याचे आरोग्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असताना, त्यांनी भाजप आमदार राणा पाटील यांना ‘चेकमेट’ दिला होता. तसेच नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत तानाजी सावंत यांनी भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाचा पराभव करत भूम-परंडा नगराध्यक्ष पदावर वर्चस्व मिळवले होते. हा पराभव राणा पाटील यांच्या जिव्हारी लागला होता. त्या पराभवाचा आणि मागील अपमानाचा वचपा काढण्यासाठीच राणा पाटील यांनी ही जिल्हा परिषद निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तानाजी सावंत यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी पाटील यांनी विरोधी पक्षाचा आधार न घेता, थेट सावंत यांच्या घरातील नाराजीचा फायदा उचलला आहे.
पुतण्याला ‘फूस’, काकांचे टेन्शन वाढवले!
भूम-परंडा तालुक्यात तानाजी सावंत यांना आव्हान देण्यासाठी राणा पाटील यांनी धनंजय सावंत यांना राजकीय बळ दिले आहे. धनंजय सावंत यांनी जवळा आणि डोंजा गटात बंडाचे निशाण फडकवले असून, यामागे राणा पाटील यांचीच खेळी असल्याचे बोलले जात आहे. “निवडणुकीत काकांना विरोध करा, भाजप तुमच्या पाठिशी आहे,” असा संदेशच जणू राणा पाटलांनी दिल्याने धनंजय सावंत आक्रमक झाले आहेत.
राणा पाटलांच्या पाठिंब्यामुळेच धनंजय सावंतांची भाषा बदलली?
नेहमी काकापुढे नतमस्तक राहणारे धनंजय सावंत अचानक “मी काय हरिश्चंद्र राजा नाही,” अशी आक्रमक भाषा वापरू लागले आहेत. त्यांच्या या वाढलेल्या आत्मविश्वासामागे राणा पाटलांची ‘मैत्री’ कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. नगरपालिका निवडणुकीत गप्प बसलेले धनंजय सावंत आता काकांविरोधात दंड थोपटून उभे राहिले आहेत, याचे श्रेय पूर्णपणे राणा पाटील यांच्या कट कारस्थानाला जाते.
युतीत पाप कोणाचे?
धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, तुळजापूर, उमरगा, लोहारा येथे युतीचे गोडवे गायले जात असताना, राणा पाटील यांनी भूम – परंड्यात मात्र तानाजी सावंत यांना एकटे पाडण्याचा चंग बांधला आहे. ५ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानात राणा पाटलांची ही ‘काडी’ टाकण्याची भूमिका तानाजी सावंतांना किती महागात पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महायुती आणि आघाडीची समीकरणे
धाराशिव, कळंब, तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुक्यातील बहुतांश ठिकाणी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशी महायुती असली तरी भूम-परंडा तालुक्यात मात्र वेगळे चित्र आहे. जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला धाराशिव-कळंब व तुळजापूर तालुक्यात ३, तर उमरगा-लोहारा तालुक्यात ४ जागा मिळाल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी शिवसेनेच्या जागेवर भाजपचे उमेदवार असून, अजित पवार गटाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे भाजपसोबत असताना, तानाजी सावंत मात्र भाजपच्या म्हणजे राणा पाटील यांच्या विरोधात पाय रोवून उभे आहेत.
ठळक मुद्दे:
-
टार्गेट: तानाजी सावंत यांना शह देण्यासाठी राणा पाटील सक्रिय.
-
रणनीती: घरातील वादाला खतपाणी घालत युतीधर्माचे उल्लंघन.
-
हिशोब: नगरपालिका निवडणुकीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपचे बंडखोरांना पाठबळ.
-
महायुती: जिल्ह्यात युती, पण भूम-परंड्यात बिघाडी.
-
संघर्ष: तानाजी सावंत (शिंदे गट) विरुद्ध धनंजय सावंत (बंडखोर, भाजप पुरस्कृत).







