धाराशिव: वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) कामासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहरातील साठे चौक येथे घडली आहे. याप्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश शिवाजी कदम (वय ३७, विद्युत सहायक, रा. आयोध्या नगर, तुळजापूर) आणि त्यांचे सहकारी दत्तात्रय तानाजी शितोळे हे शनिवारी (दि. ३१) सकाळी १० वाजेच्या सुमारास शासकीय कर्तव्यावर होते. ते साठे चौकातील ग्राहक हनुमंत एकनाथराव खळदकर यांच्या घरी कामासाठी गेले होते.
त्यावेळी आरोपी महिबुब चाँद शेख (रा. धाराशिव) आणि त्याच्या सोबत असलेल्या इतर पाच जणांनी तेथे येत गैरकायद्याची मंडळी जमवली. त्यांनी दिनेश कदम आणि दत्तात्रय शितोळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी लोखंडी रॉडने दोन्ही कर्मचाऱ्यांना मारहाण करून जखमी केले आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी दिनेश कदम यांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आरोपी महबुब शेख व इतर पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम १२१(१), १८९(२), १९०, १३२, ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भर दिवसा शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.







